मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३२५

                         विवेकानंद अमृत ३२५

     हिंदुस्थानातील सामाजिक नियमांमध्ये कालानुरूप मोठे बदल झाले आहेत . मूलतः हे नियम ही एका मोठ्या रचनेची बीजे या स्वरुपात होते . ही रचना कालपटावर हळूहळू उलगडणार होती . प्राचीन भारतीय ऋषींची दृष्टी इतके दूरचे पाहत असे की, त्यांच्या द्रष्टेपणाचे गुणग्रहण करता येण्यासाठी जगाला अजून अनेक शतके लागतील .  

विवेकानंद अमृत ३२४

                        विवेकानंद अमृत ३२४

     हिंदुस्थानची अवनती झाली याचे कारण पूर्वजांनी घालून दिलेले नीतिनियम वाईट होते हे नसून त्या नियमांची परिणामकारकता सिद्ध होण्याइतका अवधी मिळू शकला नाही हे होय . 

शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३२३

                        विवेकानंद अमृत ३२३

     गहन आणि विशाल सरितापात्रे, त्यातून दुथडी भरून अवखळपणे वाहणारे पाणी, नंदनवनाला लाजवतील अशी नद्यांच्या काठांवरची सुरम्य उद्याने, त्या उद्यानांमधले सुंदर संगमरवरी प्रासाद, त्यांच्यावर कोरलेल्या अत्यंत देखण्या कलाकृती ही हिंदुस्थानच्या चित्राची एक बाजू . 

गुरुवार, २६ डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३२२

                         विवेकानंद अमृत ३२२

     प्रत्येक व्यक्तीमध्ये एक प्राणतत्व असते . बाह्यतः दिसणारा माणूस हा त्या तत्वाची एक अभिव्यक्ती असते . जणू त्याच्या रूपाने, त्याच्या भाषेतून ते अमूर्त तत्व व्यक्त होऊ पाहत असते . तसेच प्रत्येक राष्ट्राला सुद्धा एक प्राणभूत राष्ट्रीय तत्व असते . ज्या दिवशी त्या प्राणभूत तत्वाची जगाला असलेली आवश्यकता संपेल त्याचवेळी त्या राष्ट्राचे अस्तित्वही संपेल . अंतर्बाह्य दुःखदारिद्र्य, अत्याचार यांनी पिडलेले असूनही हिंदुस्थान अजून जिवंत आहे, चैतन्यपूर्ण आहे याचे कारणच हे की, त्याच्या प्राणभूत तत्वाची जगाला अद्याप आवश्यकता आहे . 

बुधवार, २५ डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३२१

                       विवेकानंद अमृत ३२१

     जागतिक संस्कृतीला हिंदुस्थानचे अद्याप काही योगदान करायचे बाकी आहे, म्हणूनच हिंदुस्थान जिवंत आहे, चैतन्यपूर्ण आहे हे आपण समजून घ्या . 

शुक्रवार, २० डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३२०

                        विवेकानंद अमृत ३२०

     अमुक एक सद्गुण ही काही कोण्या एका राष्ट्राची मक्तेदारी होऊ शकत नाही . तरीही व्यक्तींच्याबाबत जसे असते तसे राष्ट्रांच्याहीबाबत असते . म्हणजे काही राष्ट्रांमध्ये, काही विशिष्ट गुणांचा विशेष परिपोष झालेला आपल्याला आढळून येतो .  

गुरुवार, १९ डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३१९

                       विवेकानंद अमृत ३१९

     हिंदूंचे सर्वप्रथम ध्येय आहे मुक्ती . पाश्चात्यांचे सर्वप्रथम ध्येय आहे धर्म . आपण मुक्तीची कांक्षा धरतो ; ते धर्माची धरतात . मीमांसक ज्या अर्थाने धर्म हा शब्द वापरतात त्या अर्थाने मी तो वापरीत आहे . ज्यामुळे इह आणि परलोकात माणूस सुखाची इच्छा बाळगतो तो धर्म . धर्म हा कर्मावर आधारित आहे . धर्म हा माणसाला सुखाच्या पाठीमागे धावायला लावत असतो आणि आनंदप्राप्तीसाठी काम करायला लावत असतो . 

बुधवार, १८ डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३१८

                           विवेकानंद अमृत ३१८

     सुख कोणत्याही जगातले असो : ते केव्हातरी संपतेच . ते काही शाश्वत सुख नाही . म्हणून मनुष्याने मुक्त होण्याची आकांक्षा धरली पाहिजे, शरिराची गुलामी झुगारून दिली पाहिजे . हा मोक्षमार्ग तुम्हाला फक्त हिंदुस्थानातच सापडेल, अन्यत्र नाही .  

सोमवार, १६ डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३१७

                        विवेकानंद अमृत ३१७

     अहिंसा योग्यच आहे . दुष्टतेचा प्रतिरोध करू नये हे एक महान सत्य आहे . पण हिंदू शास्त्रे म्हणतात, " तू गृहस्थ आहेस. कुणीतरी तुझ्या थोबाडीत ठेऊन दिली आणि त्याचा तू प्रतिकार केलास नाहीस, जेवढ्यास तेवढा बदल घेतला नाहीस तर तू खरोखर पापी माणूस आहेस ."  

रविवार, १५ डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३१६

                      विवेकानंद अमृत ३१६

     गृहस्थाश्रमी लोकांनी खूप प्रयत्न करून उत्साहाने संपत्ती मिळवली पाहिजे . आपल्या कुटुंबाचे आणि इतरांचे उत्तम पोषण केले पाहिजे . त्यांच्या सुखसोयीकडे लक्ष दिले पाहिजे . शक्यतो लोकहिताची कामे केली पाहिजेत . एवढेही तुम्ही करू शकला नाहीत तर मग स्वतःला माणूस कसले म्हणविता ? तुम्ही साधे गृहस्थधर्मी सुद्धा नाही; मग मोक्षाच्या पोकळ गोष्टी कशासाठी ?  

विवेकानंद अमृत ३१५

                         विवेकानंद अमृत ३१५

     माझ्या धर्मबांधवांनो, माझे तुम्हाला हेच सांगणे आहे . अन्याय करू नका . कोणाला अकारण दुखवू नका . इतरांचे जेवढे भले करता येईल तेवढे करा . पण दुसरे कोणी अत्याचार करत असतील तर ते मुकाट्याने सहन करणे हे गृहस्थधर्माच्या दृष्टीने मोठे पाप होय .  

शुक्रवार, १३ डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३१४

                         विवेकानंद अमृत ३१४

     वीरपुरुष पृथ्वीतलावरची सुखे भोगतात . तुमचे पौरुष दाखवा; साम, दाम, दंड आणि भेद तसेच खुले युद्ध या सर्वांचा उपयोग करून तुमच्या विरोधकांवर मात करा, विजयी व्हा आणि या जगातील सुखांचा आस्वाद घ्या तरच तुम्ही धार्मिक आहांत . अपमान मुकाट्याने गिळून,लोकांच्या लाथा खात जगणे हे शरमेचे जिणे होय, तो साक्षात नरक होय असे शास्त्रांचे म्हणणे आहे . स्वधर्म हे सत्यांचे सत्य आहे .   

गुरुवार, १२ डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३१३

                      विवेकानंद अमृत ३१३

     सात्विक मनुष्य शांत असतो, काही करताना दिसत नाही हे खरे . पण ते नैष्कर्म्य हे महान शक्तींच्या केंद्रीकरणाचा परिणाम असते . ती शांती प्रचंड शक्तीची जन्मदात्री असते. सात्विक व्यक्तीला आपल्यासारखी हातापायांनी कामे करावी लागतच नाहीत . केवळ त्यांच्या संकल्पाने त्यांची सर्व कार्ये सिद्धीस जातात . 

बुधवार, ११ डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३१२

                      विवेकानंद अमृत ३१२

     सत्वाचा ज्याच्यात परिपोष झाला आहे तो ब्राह्मण . त्याची सर्वत्र पूजा होते . त्याला काय दारोदार ' माझी पूजा करा ' असे सांगत फिरावे लागते ? सर्वशक्तिमयी जगन्माता तिच्या स्वतःच्या हाताने त्याच्या मस्तकावर सुवर्णाक्षरांनी लिहिते : ' या माझ्या सुपुत्राची, या महान आत्म्याची पूजा करा . ' आणि सारे जग ते वाचते, ऐकते आणि त्या महात्म्यापुढे लीनपणे नतमस्तक होते .  

मंगळवार, १० डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३११

                            विवेकानंद अमृत ३११

     लक्षात ठेवा बायकी आवाजात, भीत-भीत, अनुनासिक स्वरात, जणू सात दिवस पोटात अन्न नाही अशा मंद्पणाने तुमच्याशी कोणी बोलत असेल; ओल्या भिजल्या, फाटक्या गोधडीसारखा त्याचा अवतार असेल आणि कुणी लाथ दिली तर " का रे " म्हणण्याची सुद्धा हिम्मत नाही असे कुणी तुम्हाला भेटेल तर ती व्यक्ती तमोगुणी आहे असे खुशाल समजा . ही सत्वाची, उन्नतीची लक्षणे नव्हेत तर तमाची, अधःपाताची, मृत्यूची लक्षणे आहेत . 

विवेकानंद अमृत ३१०

                         विवेकानंद अमृत ३१०

गेली सहस्र वर्षे हा देश कृष्ण भगवानांच्या प्रार्थनांनी दुमदुमत आहे . पण भगवंत प्रार्थना ऐकायला तयारच नाहीत . का ऐकावे त्यांनी तुमचे ? मूर्खांचे गाऱ्हाणे जर माणसे सुद्धा ऐकत नाहीत तर मग परमेश्वराने तरी ते का ऐकावे? आता एकाच मार्ग आहे: भगवंताचे गीतेतील शब्द ध्यानी घेणे 


क्लैब्यं मा स्म गमः पार्थ न एतद् त्वय्युपपद्यते | 

पार्था दौर्बल्य टाकून दे . 


तस्मात्वमुत्तिष्ठ यशोलभस्व | 

 म्हणून उठ आणि यश, कीर्ती संपादन कर .  

सोमवार, ९ डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३०९

                        विवेकानंद अमृत ३०९

     केवढा दैवदुर्विलास पहा ! येशु ख्रिस्त-युरोपियनांचे दैवत-त्याची शिकवण अशी की कुणाशी शत्रुत्व करू नका . जे तुमच्याशी शत्रुत्व करतात त्यांचेही शुभ चिंतावे . तुमच्या उजव्या गालावर कोणी थप्पड मारली तर डावा गाल पुढे करावा . सर्व कार्ये थांबवून परलोकाची वाट पहावी, कारण जगाचा शेवट आता जवळ आला आहे .  
     आणि गीतेत श्रीकृष्णानी सांगितले आहे की, खूप उत्साहाने काम करा, तुमच्या शत्रूचा निःपात करा आणि भूमितलावरील संपदा सुखाने भोगा .      पण शेवटी घडले काय ? ख्रिस्ताला जे अभिप्रेत होते त्याच्या, नि कृष्णाला जे अभिप्रेत होते त्याच्या नेमके उलटे घडले . 

रविवार, ८ डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३०८

                          विवेकानंद अमृत ३०८

     केवळ वैदिक धर्मानेच चार पुरुषार्थांची मांडणी केली . धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या पुरुषार्थांच्या आधारे सामाजिक नीतीनियमांची रचना केली . बुद्ध आपल्या विनाशाला कारणीभूत झाला आणि ख्रिस्त ग्रीस तसेच रोमच्या विनाशाला कारणीभूत झाला . नंतर यथावकाश सुदैवाने युरोपीय हे प्रोटेस्टंट  बनले . पोपच्या माध्यमाने त्यांच्यावर लादली गेलेली ख्रिस्ताची शिकवणूक त्यांनी झुगारून दिली आणि सुटकेचा निःश्वास सोडला .  

शनिवार, ७ डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३०७

                      विवेकानंद अमृत ३०७

     प्रत्येक राष्ट्राला काही नियतिनियोजित कार्य असते . जगाला देण्यासारखा काही एक संदेश असतो, जीवितहेतू असतो . म्हणून सर्वांत प्रथम आपण आपल्या वंशाचे जीवितकार्य काय, त्याला नियतीने कोणते काम योजून दिले आहे, राष्ट्रांच्या मांदियाळीत त्याचे स्थान काय, भिन्न भन्न वंशाच्या ऐक्यासाठी तो काय योगदान करू शकेल हे समजून घेतले पाहिजे . 

विवेकानंद अमृत ३०६

                      विवेकानंद अमृत ३०६

     आपल्या पूर्वजांची लाज न बाळगणे हे मी माझ्या आयुष्यातले एक महत्वाचे तत्व समजत आलो आहे . मी स्वाभिमान्यामधला स्वाभिमानी माणूस आहे . पण हे मी स्पष्टच सांगतो की, हा स्वाभिमान स्वतःच्या कर्तृत्वाचा नसून पूर्वजांकडून जे धन मिळाले आहे त्याचा आहे . मी जेवढा  वळून पाहतो, इतिहासाचा जेवढा अभ्यास करतो तेवढा माझा स्वाभिमान प्रदीप्त होतो . या स्वभिमानानेच मला सामर्थ्य, निष्ठा आणि धैर्य दिले आहे . धुळीतून उचलून उभे केले आहे . आणि पूर्वजांच्या वंशचैतन्याने योजलेल्या कार्याला प्रवृत्त केले आहे .  

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३०५

                         विवेकानंद अमृत ३०५

     पुरातन आर्यांच्या सुपुत्रांनो ! पूर्वजांच्या रक्तांतून वहात आलेली ती निष्ठा तुमच्यातही संक्रमित होवो, तुमच्या जीवनाचा अविभाज्य अंश होवो आणि उभ्या जगाच्या मुक्ततेला ती कारणीभूत ठरो . 

मंगळवार, ३ डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३०४

                      विवेकानंद अमृत ३०४

     प्रत्येक व्यक्तीला जसे काही व्यक्तिमत्व असते, तसे प्रत्येक राष्ट्रालाही त्याचे व्यक्तिमत्व असते . एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपासून वेगळी ओळखू येते ती तिच्या काही वैशिष्ट्यांमुळे . त्याचप्रमाणे एक वंश इतर वंशांपेक्षा वेगळा ओळखू येतो . प्रत्येक व्यक्तीचे काही जीवितकार्य असते, ते निसर्गनियमांनी सिद्ध झालेले असते . त्याच्या भूतकालीन कर्मांनी त्याच्या पुढच्या जीवनाची एक रेषा ठरवून दिलेली असते . तसेच राष्ट्रांबाबतही असते . प्रत्येक राष्ट्राचे त्याच्यासाठी नियतीने योजलेले असे काही कार्य असते . जगाला देण्याकरिता त्याचा काही संदेश असतो . प्रत्येक राष्ट्राचा काही जीवनहेतू असतो . 


सोमवार, २ डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३०३

                          विवेकानंद अमृत ३०३

     म्हणूनच अगदी प्रारंभीच आपण लक्षात ठेवले पाहिजे की, आपल्या वंशाला त्याचे काही जीवितकार्य आहे ., काही जीवनहेतू आहे . राष्ट्रांच्या मांदियाळीत त्याचे म्हणून एक खास स्थान आहे आणि वांशिक एकतेबाबत त्याला करता येण्यासारखे काही विशेष योगदान आहे . 

रविवार, १ डिसेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३०२

                       विवेकानंद अमृत ३०२

     एखाद्या राष्ट्राच्या जीवनहेतूला ज्यांच्या अभावामुळे धक्का पोचत नाही असे कोणतेही हक्क तुम्ही त्या राष्ट्राकडून काढून घ्या, किंबहुना असे सगळेच हक्क काढून घ्या, ते राष्ट्र तक्रार करणार नाही . पण त्या राष्ट्राचे राष्ट्रीयत्व ज्यांत साठविलेले आहे अशा गोष्टींवर तुम्ही छोटासा जरी आघात केलात तरी ते राष्ट्र प्रचंड सामर्थ्यानिशी प्रतिकारार्थ सिद्ध होईल . 

विवेकानंद अमृत ३०१

                     विवेकानंद अमृत ३०१

     हिंदूंचे म्हणणे असे असते की, राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्य या चांगल्या गोष्टी आहेत हे खरे; पण आत्मिक स्वातंत्र्य, मुक्ती ही सर्वांत सत्य गोष्ट आहे . हाच आमचा जीवनहेतू . याबाबत वैदिक, जैन, बौद्ध, अद्वैती, विशिष्ट अद्वैती किंवा द्वैती कुणीही घ्या . सर्वांचे अगदी एकमत असेल .  

शनिवार, ३० नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत ३००

                         विवेकानंद अमृत ३००

     तुम्हाला मग काय वाटेल ते करा . त्याचे हिंदूला फारसे सोयरसुतक नसते . तो शांत राहतो . पण धर्माच्या बाबतीत त्याला छळून पहा, तुमचा नाश ओढवलाच म्हणून समजा . त्याचे सर्वस्व लुटून घ्या, त्याला लाथा घाला, शिव्या द्या, त्याला फारसे काही वाटायचे नाही . पण त्याचा धर्म मात्र दुखवू नका .   

गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २९९

                       विवेकानंद अमृत २९९

     आधुनिक काळात हिंदुस्थानावर पठाण घराण्यांनी स्वाऱ्या केल्या . कित्येक घराणी आली आणि गेली . पण कोणाचाच हिंदुस्थानच्या साम्र्याज्यावर जम बसू शकला नाही . कारण ते सर्व हिंदू धर्मावर हल्ले चढवत होते . त्या मानाने मोगलांनी हिंदूंच्या धर्माला फारसा धक्का लावला नाही . आणि म्हणूनच मोगल घराण्यांनी जास्त दृढपणे सत्ता चालविली . एवढेच नव्हे तर त्यांच्या साम्राज्याचा आधार हिंदूच होते .  

बुधवार, २७ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २९८

                        विवेकानंद अमृत २९८

     आपले चैतन्य, आपले सामर्थ्य, नव्हे आपले राष्ट्रीय जीवनच आपला धर्म आहे . हे योग्य की अयोग्य, चूक की बरोबर, भविष्यकाळाचा विचार करता लाभाचे की बिनलाभाचे, ह्याची मला चर्चा करायची नाही . हे चांगले असो व वाईट असो; आहे हे असे आहे, त्यातून आपली सुटका नाही . हे आज असे आहे, ते भविष्यकाळातही तसेच राहणार आहे . तुम्हाला ते मान्य करावेच लागेल . माझी धर्मावर जेवढी श्रद्धा आहे तेवढी तुमची नसली तरी ! नियतीच्या योजनेने तुम्ही बांधलेले आहात . यातून स्वतःला सोडवून घेऊ पहाल तर शतशः खंडित व्हाल . आपल्या वंशाचे हेच जीवन आहे, त्याचाच आपण परिपोष केला पाहिजे .   


मंगळवार, २६ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २९७

                        विवेकानंद अमृत २९७

     आपण आपल्या राष्ट्रीय चैतन्याचे प्राणपणाने जतन केले . त्यासाठी सर्वस्व समर्पण केले . म्हणूनच शतकानुशतके होत आलेले आघात आपण सोसू शकलो . आपल्या पूर्वजांनी त्यासाठी सारे काही सोसले . अगदी म्रुत्युसहि कवटाळले . आपले धर्मचैतन्य सांभाळले . परकीय आक्रमकांच्या बेबंद लाटेखाली मंदिरांमागून मंदिरे कोसळत होती . पण ती लाट परतून जाताच त्याच मंदिरांचे कलश पुन्हा एकदा उन्नत मस्तकाने उभे राहिले . 

सोमवार, २५ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २९६

                       विवेकानंद अमृत २९६

     दक्षिण हिंदुस्थानातील काही मंदिरे आणि गुजरातेतील सोमनाथाचे मंदिर आपल्याला खूपच काही शिकवून जातात . पुस्तकाच्या राशी वाचून हिंदू वंशाच्या इतिहासाबाबत जी समज येणार नाही, ती केवळ सोम्नाथाकडे पहिल्याने येईल . शतावधी प्रहारांच्या आणि शतावधी पुनर्निर्माणाच्या कहाण्या या मंदिरावर आपल्याला वाचता येतील . ही मंदिरे पुनः पुन्हा भग्न होत होती आणि पुनः पुन्हा राखेतून उभी राहात होती - नव्या चैतन्याने, नव्या सामर्थ्याने . हाच आपला राष्ट्रीय स्वभाव आहे . हाच आपला राष्ट्रीय जीवनप्रवाह आहे . त्याचे अनुगामी व्हा . तो तुम्हाला वैभवाप्रत नेईल . त्याचा पाठपुरावा सोडून द्या - लगेच तुमचा मृत्यू , तुमचा विनाश ठरलेलाच आहे . 

रविवार, २४ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २९५

                    विवेकानंद अमृत २९५

     मला असे म्हणायचे नाही की, बाकी सगळ्या गोष्टी निरर्थक आहेत . राजकीय आणि सामाजिक सुधारणा आवश्यक आहेतच . पण त्या दुय्यम आहेत . येथे सदैव धर्मालाच प्राधान्याचे स्थान आहे .  

शनिवार, २३ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २९४

                       विवेकानंद अमृत २९४

     या राष्ट्राचा आत्मा त्याच्या धर्मातच आहे . आजवर कोणीही या आत्म्याला धक्का पोचवू शकलेले नाही . म्हणून अनंत प्रहार आणि आक्रमणे सोसूनही हिंदू राष्ट्र अजून चैतन्यपूर्ण आहे .  

विवेकानंद अमृत २९३

                         विवेकानंद अमृत २९३

     भिन्न भिन्न रूपे असली तरी अग्नी जसा एकच असतो तसे ते विराट चैतन्य एकच आहे . मग ते फ्रेंचांच्या राजकीय स्वातंत्र्याच्या रूपाने व्यक्त होवो, इंग्रजांच्या व्यापारी बुद्धीतून आणि समान लाभाच्या तत्त्वातून व्यक्त होवो किंवा हिंदूंच्या मुक्ती आणि आत्मिक स्वातंत्र्याच्या आकांक्षेतून व्यक्त होवो . 

शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २९२

                            विवेकानंद अमृत २९२

     मी आपल्याला अत्यंत गांभीर्याने असे विचारू इच्छितो की, सहस्रो वर्षांच्या परंपरेतून विकसित झालेले आपले राष्ट्रीय चारित्र्य सोडणे सोपे की, केवळ काही शतकांचा, आपल्यावर कलम केला गेलेला कोणता तरी परकीय संस्कार सोडणे सोपे ?  

बुधवार, २० नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २९१

                       विवेकानंद अमृत २९१

     पर्वतश्रेष्ठाच्या कुशीतून निघून सहस्रो मैलांचा प्रवास करीत एक महान सरिताप्रवाह भूतलावर आला आहे . तो आता आपल्या मूलस्थानी जाऊ शकेल का ? आत्तापर्यंत क्रमलेली वाट पुन्हा उलटी शोधत जायचे म्हटले तर तो प्रवाह खंडित होईल, सुकून जाईल . महानदीने केव्हा-ना-केव्हा सागरालाच जाऊन मिळायला हवे . 

मंगळवार, १९ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २९०

                      विवेकानंद अमृत २९०

     दहा सहस्र वर्षांचा आपला राष्ट्रीय जीवनाचा प्रवास जर चुकीचाच आहे असे आपल्याला वाटत असेल तर त्याला आता इलाज नाही . आता नवीन राष्ट्रीय स्वभाव घडवायला बसले तर त्याचा परिणाम विनाशातच होईल .  

सोमवार, १८ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २८९

                    विवेकानंद अमृत २८९

     मला क्षमा करा, पण आपले राष्ट्रीय साध्य चूक आहे असे म्हणणे हे केवळ अज्ञानाचे लक्षण आहे . प्रथम दुसऱ्या देशामध्ये जा, त्यांची संस्कृती स्वतःच्या डोळ्यांनी पहा . इतरांच्या दृष्टीकोनातून नको . तुम्हाला जर विचारशक्ती असेल तर त्यावर सखोल विचार करा . मग तुम्ही आपले स्वतःचे धर्मग्रंथ वाचा, आपले प्राचीन साहित्य वाचा, सर्व हिंदुस्थानभर प्रवास करा . सुबुद्ध आणि तीक्ष्ण दृष्टीच्या अभ्यासकाप्रमाणे या देशाच्या विविध भागांचा, येथील चालीरीती, रीतीरिवाज यांचा अभ्यास करा . म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वछ दिसून येईल की, हे राष्ट्र अद्यापी चैतन्यपूर्ण आहे . याच्या लोकजीवनात अजूनही तेच ते सनातन स्फुरण भरून राहिलेले आहे . 


रविवार, १७ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २८८

                      विवेकानंद अमृत २८८

     विनाश आणि मृत्यू यांच्या राखेत आजही आपल्या राष्ट्रीय जीवनाचे निखारे धगधगत आहेत . या देशाचे जीवन म्हणजे धर्म . याला धर्माचीच भाषा उमगते . धर्म हेच याचे प्राणतत्व .  

शनिवार, १६ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २८७

                         विवेकानंद अमृत २८७

     प्रत्येक देशाची स्वतःची अशी एक वैशिष्ट्यपूर्ण  कार्यपद्धती असते . काही राजकारणाच्या माध्यमातून काम करतात, काही सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून, तर काही अन्य प्रकारे . आपल्याबाबत धर्म हेच केवळ मध्यम आहे . 

शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २८६

                      विवेकानंद अमृत २८६

     इंग्लिश माणसाला धर्म राजकारणाच्या माध्यमातून कळतो, अमेरिकन माणसाला कदाचित सामाजिक सुधारणामधून धर्म कळेल . पण हिंदूला राजकारण कळेल तेहि धर्माच्या माध्यमातून, समाजशास्त्र आले पाहिजे तेही धर्मातूनच, सर्व काही कळेल ते धर्माच्या माध्यमातूनच . कारण हिंदू राष्ट्रीय जीवनसंगीताचा धर्म हा प्राणस्वर आहे .  

विवेकानंद अमृत २८५

                      विवेकानंद अमृत २८५

     राजकीय स्वामित्व हा एखाद्या देशाचा प्राणस्वर असू शकेल . धर्म आणि अन्य गोष्टी हे त्या स्वराचे संवादी स्वर असतील . पण हा एक देश असा आहे की, अध्यात्म आणि चरम त्याग हेच इथले जीवनस्वर आहेत . या देशाचे सूत्र असे की, दिसणारे-भासणारे जग ही दोन दिवसांची माया आहे . म्हणून आत्मदर्शनापुढे विज्ञान, उपभोग, सत्ता,संपत्ती, नांव, कीर्ती या सर्व गोष्टी दुय्यम आहेत . 

बुधवार, १३ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २८४

                       विवेकानंद अमृत २८४

     प्रत्येक हिंदू  मुलात आध्यात्मिकता आणि वांशिक शुद्धता ही जणू जन्मजात असते . हिंदू राष्ट्रीय चारित्र्याचे रहस्य असे की, पाश्चात्य विद्या, सामर्थ्य, सत्ता आणि कीर्ती ही तो आत्मदर्शनापुढे तुच्छ मानतो . 

विवेकानंद अमृत २८३

                       विवेकानंद अमृत २८३

     माझ्या मित्रांनो ! सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट जर काही असेल तर आपले अध्यात्म, आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेले हे अमोल धन हृदयाशी घट्ट धरून ठेवा . असा देश तुम्हाला माहिती आहे का की, जेथील मोठे मोठे सम्राट आपली कुलपरंपरा कोण्या राजाशी नेउन भिडवत नाहीत; अथवा कोण्या दऱ्याखोऱ्यात लपून राहणाऱ्या, वेळी अवेळी लोकांना लुटणाऱ्या पेंढारी सरदारांशी जोडत नाहीत; तर कौपिनधारी, वनात राहणाऱ्या ब्रह्मवेत्त्या ऋषींशी नेउन जोडतात ? हिंदुस्थान हा असा देश आहे . 

सोमवार, ११ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २८२

                      विवेकानंद अमृत २८२

     अध्यात्मावर तुमचा विश्वास असो अगर नसो, तुम्हाला राष्ट्रजीवनासाठी अध्यात्माला दृढ धरून राहिलेच पाहिजे . एका हाताने आपले अध्यात्म घट्ट धरून ठेवा आणि दुसऱ्या हाताने अन्य वंशाकडून तुम्हाला जे काही घेणे शक्य आहे ते सर्व घ्या . मात्र आपल्या राष्ट्रीय जीवनध्येयापुढे अन्य सर्व गोष्टी दुय्यम आहेत हे विसरू नका . त्यातूनच हिंदुस्थानचा अपूर्व, भव्यतम भविष्यकाळ दृष्टीपथात येईल . माझी श्रद्धा आहे की तो निकट आहे . यापूर्वी कधीही नव्हते असे हिंदुस्थानचे उज्ज्वल उज्ज्वलतम चित्र मला दृष्टीपुढे दिसत आहे . 

रविवार, १० नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २८१

                    विवेकानंद अमृत २८१

     हीच प्रार्थना कर : " अहो गौरीपती ! हे जगज्जननी ! मला पुरुषार्थ प्रदान करा . हे शक्तीदेवते ! माझे दौर्बल्य विलयास ने, माझ्यातील भीरुता काढून टाक आणि मला पौरुषसंपन्न कर ! " 

शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २८०

                      विवेकानंद अमृत २८०

     ऊठ ! बोल : " हिंदुस्थानची धूली हाच माझा स्वर्ग . हिंदुस्थानचे सदभाग्य तेच माझे सदभाग्य ! " अरे भाई, दिवसरात्र याचाच जयजयकार कर . 

शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २७९

                    विवेकानंद अमृत २७९

     कमरेला केवळ कौपिन असले तरी उच्चरवाने घोषणा कर : " प्रत्येक भारतवासी हा माझा बंधू आहे . भारतीयत्व हेच माझे जीवन, भारताच्या देवदेवता ह्याच माझ्याही देवदेवता . हा विशाल भारतीय समाज म्हणजे माझ्या बालपणीचा हिंदोळा, यौवनाचे नंदनवन, आणि वृद्धावस्थेतील वाराणशी , "

गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २७८

                        विवेकानंद अमृत २७८

     आपण भारतवासी आहोत याचा अभिमान धर आणि अभिमानाने म्हण : " मी भारतवासी आहे . प्रत्येक भारतवासी माझा भाऊ आहे . अज्ञानी भारतवासी, दरिद्री आणि दलित भारतवासी, ब्राह्मण भारतवासी आणि भंगी भारतवासी हे सारे माझे भाऊ आहेत . " 

विवेकानंद अमृत २७७

                       विवेकानंद अमृत २७७

     विसरू नकोस की, तुझी समाजरचना म्हणजे विश्वशक्तीचे एक स्पंदन आहे . विसरू नकोस की, हे दलित, अजाण, निरक्षर, हा कोळी, तो भंगी हे तुझ्याच हाडामासाचे तुझेच भाऊ आहेत . हे शूर पुरुषा, धैर्यशील हो ! 

सोमवार, ४ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २७६

                     विवेकानंद अमृत २७६

     माझ्या भारता ! 
     तुझ्या स्त्रीत्वाचा आदर्श हा सीता, सावित्री, दमयंती यांचा आहे हे विसरु नकोस . ज्या देवाची तू  पूजा करतोस तो देव सर्वसंगपरित्यागी वैराग्यशिरोमणी असा उमापती शंकर आहे . 
     विसरू नकोस की, आपल्याकडे विवाह, संपत्ती, सर्व जीवन ही विषयसुखासाठी नसतात, केवळ व्यक्तिगत उपभोगासाठी नसतात . 
      विसरू नकोस की, जगदंबेच्या चरणापाशी समर्पित होण्यासाठी तुझा जन्म आहे . 

रविवार, ३ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २७५

                      विवेकानंद अमृत २७५

     हे भारता ! केवळ दुसऱ्यांचे सूर ओढून, परक्यांची भ्रष्ट नक्कल करून तिऱ्हाईतांवर अवलंबून राहून तू संस्कृतीच्या आणि श्रेष्ठतेच्या उच्चपदावर आरूढ होऊ शकशील का ? 

विवेकानंद अमृत २७४

                     विवेकानंद अमृत २७४

     योग्य आणि अयोग्य कल्पनांच्या या मंथनातून हिंदुस्थानच्या भविष्यकालाबद्धल काही आशेचे चिन्ह दिसू लागले आहे . हिंदुस्थानातील प्राचीन कल्पना आणि पाश्चात्य देशांकडून नव्याने आलेल्या कल्पना यांचा जो संघर्ष झाला, त्यातून हिंदुस्थानला नव्यानेच जाग येऊ लागली . 

शनिवार, २ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २७३

                      विवेकानंद अमृत २७३

     एका बाजूला शुद्ध भौतिकवाद, प्रचंड सामर्थ्यसत्ता, वैभव, इंद्रियसुखांमागे धावण्याची आस असे सर्व पाश्चात्य साहित्यातील प्रवाह भारतीय तरुणाचे मन खळबळवून टाकतात, तर दुसरीकडे ह्याच्याशी अगदी विसंगत अशी हिंदुस्थानच्या प्राचीन देवदेवतांची आर्त आवाहने त्यांच्या कर्णरंध्रात खोलवर शिरत असतात . 

शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २७२

                          विवेकानंद अमृत २७२

     व्यक्तीस्वातंत्र्य हे पश्चिमेचे ध्येय आहे . उत्पादक शिक्षण ही त्यांची परिभाषा आहे . राजकारण हे साधन आहे . हिंदुस्थानात मुक्ती हे ध्येय आहे . वेद ही परिभाषा आहे आणि सर्वसंगपरित्याग हे साधन आहे . 

बुधवार, ३० ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २७१

                    विवेकानंद अमृत २७१

     काही वेळा हिंदुस्थानातल्या तरुणांना वाटते की, पारमार्थिक हिताच्या धूसर कल्पनांमागे लागून आपण इहलोकांतल्या जीवनाची चव हरवून बसतो आहोत . पण पुन्हा ते भारून टाकणारे शब्द त्यांच्या कानी येऊ लागतात . 

इति संसारे स्फ़ुटतर दोषः कथमिह मानव तव संतोषः |  

     हे मानवा ! या मर्त्य, भंगुर जगात तुला आनंद कोठून सापडणार ? 

मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २७०

                        विवेकानंद अमृत २७०

     एकीकडे नवभारताला वाटत आहे की, पाश्चात्य देश जे करतात ते निःसंशय चांगलेच असले पाहिजे . एरवी त्यांनी एवढी प्रगती कशी केली असती ? दुसरीकडे सनातन भारत म्हणतो आहे, " अरे, वीज मोठ्या दिमाखाने झळाळते - पण क्षणभरच ! ती तुमचे डोळे दिपवून टाकत आहे . सावध व्हा . "  

सोमवार, २८ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २६९

                         विवेकानंद अमृत २६९

     आपल्याला खूपच गोष्टी शिकायच्या आहेत . मरेपर्यंत नव्या आणि श्रेष्ठ गोष्टी शिकण्यासाठी धडपडत राहिले पाहिजे. असे धडपडणे हेच मनुष्यजीवनाचे सार आहे . 

विवेकानंद अमृत २६८

                    विवेकानंद अमृत २६८

     माझ्या हिंदुस्थाना ! तुला धोका आहे तो इथेच . पाश्च्यात्यांच्या अंधानुकरणाचा तुला एवढा मोठा शाप आहे की, एखादी गोष्ट चांगली की वाईट हे बुद्धीच्या, विवेकाच्या किंवा शास्त्राच्या साहाय्याने तू ठरवतच नाहीस . गोरी माणसे जे रीतीरिवाज पाळतात, ज्या कल्पना मनाशी बाळगतात त्याच चांगल्या; त्यांना जे आवडत नाही ते ते सारे वाईट ! अरेरे, बुद्धीभ्रष्टतेचा, मूर्खपणाचा याहून आणखी कोणता पुरावा हवा ? 

रविवार, २७ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २६७

                         विवेकानंद अमृत २६७

     आपण आपल्या स्वभावानुसार प्रगती केली पाहिजे . विदेशी समाजांनी आपल्यावर जे कलम केले आहे त्यानुसार वाढण्यासाठी प्रयत्न करणे हे निष्फळ होय . हिंदुस्थानला मोडून, मुरगळून इतर राष्ट्रांच्या साच्यात घालणेच अशक्य आहे . परमेश्वराची ही केवढी कृपा !

शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २६६

                        विवेकानंद अमृत २६६

     इतर समाजामध्ये ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांना मी नवे ठेवीत नाही . त्यांच्यापुरत्या त्या चांगल्या असतील, पण आपल्या दृष्टीने नाहीत . त्याच्या दृष्टीने जे अमृत आहे ते आपल्या दृष्टीने विष असू शकेल हे सर्वात प्रारंभी ध्यानात ठेवले पाहिजे . त्यांची शास्त्रे, त्यांच्या संस्था, त्यांच्या परंपरा या सर्वांतून त्यांची आजची समाजव्यवस्था घडली आहे . आपल्या पाठीशी आपली सहस्रो वर्षांची परंपरा, सहस्रो वर्षांचे संचित आहे . ते आपल्या नसानसांतून वाहात आहे . त्यातूनच आपला स्वभाव घडला आहे व त्याच मार्गाने जाणे आपणास हितावह होय . 


विवेकानंद अमृत २६५

                      विवेकानंद अमृत २६५ 

     सामाजिक जीवन सामान्यतः पुढील दोनपैकी एका गोष्टीवर आधारलेले असते . एकतर धर्म किंवा त्या त्या समाजाची गरज . एक आध्यात्मावर आधारलेले आहे, तर दुसरे इहवादावर आधारलेले आहे . एक परतत्वस्पर्शी आहे, तर दुसरे वास्तव आहे . एक या लहानशा लौकिक जगाची क्षितिजे ओलांडून पलीकडचे पहाते आणि या लौकिक जगापलीकडच्या पारलौकिक जीवनास प्रारंभ करण्याची निर्भयता त्याच्याजवळ असते . दुसरे याच जगात पाय रोउन उभे राहते आणि येथेच दृढमूल होण्यासाठी प्रयत्न करते .  


बुधवार, २३ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २६४

                      विवेकानंद अमृत २६४

     दोन प्रकारच्या संस्कृती . एक धर्मावर आधारलेली, अंतर्मुखतेचा पुरस्कार करणारी हिंदू संस्कृती . आणि दुसरी विज्ञानावर आधारलेली, बाह्य सृष्टीत रमलेली पाश्चिमात्य संस्कृती . पाश्चात्यांना सामाजिक सुधारणामधून आध्यात्मिकता यायला हवी असते . पौर्वात्यांना सामाजिक अधिकार हे अध्यात्मिकातेतून आले तरच मान्य असतात . 

मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २६३

                  विवेकानंद अमृत २६३

     आधुनिक सुधारणावाद्यांना हिंदुस्थानातील धर्माची मोडतोड केल्यावाचून सामाजिक सुधारणा करणे अशक्य वाटू लागले . त्यांनी तसा प्रयत्न केला पण तो सपशेल फसला . कारण त्यांच्यापैकी फारच थोड्यांनी स्वतः च्या धर्माचा अभ्यास केला होता आणि सर्व धर्माची जननी असलेल्या आपल्या धर्माचे शिक्षण, त्यासाठी आवश्यक ती साधना तर एकाचीही झाली नव्हती . 

विवेकानंद अमृत २६२

                  विवेकानंद अमृत २६२

     मी छातीठोकपाने सांगतो की, हिंदू समाजाच्या उन्नतीसाठी धर्माच्या विनाशाची काहीएक आवश्यकता नाही . आजची अवनती ही धर्मामुळे झालेली नसून धर्मतत्वांचे योग्य रीतीने पालन न झाल्यानेच झाली आहे . 

रविवार, २० ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २६१

                   विवेकानंद अमृत २६१

     निःस्वार्थ बुद्धीने ज्यांनी समाजसुधारणेचे प्रयत्न केले त्यांची दिशा चुकलेली असली तरी ते आदरालाच प्राप्त आहेत . या सुप्त समाजपुरुषाला जागविण्यासाठी सुधारणांचे ते धक्के आवश्यकच होते . पण ते विधायक नव्हते, नकारात्मक होते . म्हणून ते नामशेष झाले . 

विवेकानंद अमृत २६०

                       विवेकानंद अमृत २६०

     सर्व दर्शनी उत्क्रांती ही अंतर्गत प्रक्रियांची बाह्य परिणती असते हे त्यांनी ध्यानी घेतले नाही . बीज हे भोवतालच्या जगतातून प्रकाश, पाणी अशा गोष्टी ग्रहण करते, परंतु वाढते ते विशिष्ट जातीचा वृक्ष म्हणूनच . हिंदू जाती ही संपूर्णपणे नष्ट झाली आणि एक दुसरीच जाती, दुसराच समाज येथे निर्माण झाला तरच हिंदुस्थानचा युरोप होईल . एरवी ते कालत्रयी शक्य नाही .  

शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २५९

                      विवेकानंद अमृत २५९

     आमच्या सुधारणावादी चळवळीनी पाश्चात्य सुधारणावाद्यांच्या  चळवळीची अविचारी नक्कल केली; पण त्या पद्धती हिंदुस्थानात उपयोगी नाहीत हे त्यांच्या लक्षात आले नाही . म्हणून आपल्याकडच्या सुधारणावादी  चळवळीना यश लाभले नाही . इतिहासकालापासून आपला जो समाजिक स्वभाव घडत आला आहे त्याचे जतन केलेच पाहिजे . 

गुरुवार, १७ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २५८

                         विवेकानंद अमृत २५८

    प्रत्येक गोष्टीतील आवश्यक भाग कोणता आणि अनावश्यक भाग कोणता याचा विवेक करायला शिकणे आवश्यक आहे . गाभा हा शाश्वत असतो. अन्य गोष्टी या काही मर्यादित काळापुरत्या महत्वाच्या असतात . 
     जातीव्यवस्था ही सतत बदलत आली आहे . संस्कार-समारंभाचे स्वरूप बदलत आले आहे . धर्माचे बाह्य स्वरूपच बदलत आले आहे . मात्र सार, सत्व आणि तत्व बदललेले नाही ! आपल्या धर्माचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला वेदांचाच अभ्यास करावा लागतो . 

बुधवार, १६ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २५७

                        विवेकानंद अमृत २५७

     वेदांत सांगितलेली सत्ये शाश्वत आहेत . ती सार्वकालिक आहेत . पण स्मृती मात्र कालसापेक्ष आहेत . जसजसा कालौघ पुढे जाईल तसतशा नवनव्या स्मृती येतच राहतील . नवनवीन ऋषी अवतरतील . ते समाजाचे रूप बदलतील, त्याला चांगली दिशा देतील . नव्या मनुला साजेलसा नवा कर्तव्यधर्म सांगतील . 

विवेकानंद अमृत २५६

                       विवेकानंद अमृत २५६

     या देशाच्या भूतकाळात अनेक श्रेष्ठ गोष्टी घडल्या आहेत . भविष्यकाळात याहून श्रेष्ठतर गोष्टी घडवावयास खूप वाव आहे . माझी खात्री आहे की, आपली वाटचाल थांबलेली नाही . जो थांबला तो संपला . एकतर आपल्याला पुढे गेले पाहिजे किंवा मागे आले पाहिजे . एकतर प्रगती केली पाहिजे किंवा नष्ट झाले पाहिजे . आपल्या पूर्वजांनी भूतकाळात अनेक पराक्रमाची कृत्ये केली . पण आपण त्यांच्याही पुढे गेले पाहिजे . त्यांच्याहून मोठे पराक्रम केले पाहिजेत . 

मंगळवार, १५ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २५५

                        विवेकानंद अमृत २५५

    आपल्या जाती आणि इतर सामाजिक रचना या धर्माशी संबंधित आहेत असे वरवर वाटले तरी वस्तुतः तसे नाही . राष्ट्र म्हणून आपले रक्षण व्हावे यासाठी त्या रचनांची गरज होती . जेव्हा या रचनांची आत्मसंरक्षणासाठी आवश्यकता राहणार नाही तेव्हा त्या आपोआप नाश पावतील .  

सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २५४

                        विवेकानंद अमृत २५४

     माझी समजूत जसजशी वाढली तसतसे या शतकानुशतके चालत आलेल्या सामाजिक रचनांचे महत्व मला कळले . एक काळ असा होता की, त्या निरर्थक आहेत असे मला वाटत होते . पण आता त्यांच्यावर टीका करण्याचे धैर्य मला होत नाही . कारण प्रत्येक रचनेत शतकानुशतकाचे, अनुभवाने आलेले शहाणपण साठलेले आहे . 

रविवार, १३ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २५३

                       विवेकानंद अमृत २५३

     इतर देश आपल्याला जो उपदेश करतात तो ऐकायचा ठरविला तर आपली हीच गती होईल . त्या शहाण्यांना सांगा की, तुम्ही स्वतः एक समाजरचना निर्माण करून दाखवा मग आम्ही तुमचे ऐकू . तुम्हाला एक कल्पना दोन दिवस धरून ठेवता येत नाही . तुम्ही भांडता, अपयशी होता . वसंत ऋतूतल्या पतंगासारखे क्षणभंगुर तुमचे आयुष्य . बुडबुडे वर यावेत नि फुटावेत तसे तुमचे जिणे . आमच्याप्रमाणे एक स्थिर रचना करून दाखवा . शतकानुशतके टिकतील असे नीतीनियम करा . तर मग तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ आहे . तोवर माझ्या मित्रांनो, माझ्या दृष्टीने तुम्ही निव्वळ भांबावलेली मुले आहांत . 


शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २५२

                       विवेकानंद अमृत २५२

     कोणत्याही तात्कालिक सामाजिक सुधारणांचा पुरस्कार करण्याचा माझा मानस नाही . दोष दूर करण्यासाठीही मी उभा नाही . मी तुम्हाला इतकेच सांगू इच्छितो की, आपल्या पूर्वजांनी मानवी विकासासाठी एक परिपूर्ण योजना आपल्यापुढे ठेवली आहे, ती प्रत्यक्ष व्यवहारात उतरविण्यासाठी पुढे व्हा ! मानवामानवांतील अतूट नात्याची, माणसामध्ये असलेल्या सुप्त देवत्वाची अनुभूती घ्या !  

विवेकानंद अमृत २५१

                      विवेकानंद अमृत २५१

     आपल्या पूर्वजांच्या दृष्टीने ' ब्राह्मण ' हा आदर्श होता . आपल्या सर्व धर्मग्रंथात हा आदर्श स्पष्टपणे मांडला आहे . युरोपात कार्डिनल हा सार्वभौम असतो . तो आपल्या वंशाची श्रेष्ठता सिद्ध करण्यासाठी प्राणपणाने प्रयत्न करतो . हजारो पौंड खर्च करतो . डोंगरावर बसून तो प्रवाशांची टेहळणी करत असे आणि साधेल तेव्हा त्यांना लुटत असे . अशा कोणा भयंकर हुकुमशहाशी आपली वंशावळ नेउन मिळविल्याखेरीज त्यांचे समाधान होत नाही .  

बुधवार, ९ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २५०

                         विवेकानंद अमृत २५०

     हिंदुस्थानात राजे, महाराजे, आपली कुलपरंपरा ही रानात राहणाऱ्या, कंदमुळे खाणाऱ्या, कौपिनधारी, वेदाध्ययनशील अशा कोणा ऋषीशी जोडतात . तुमचा कुलपुरुष कोणी ऋषी असेल तर तुमचे कुल उत्तम; अन्यथा नाही . 

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २४९

                      विवेकानंद अमृत २४९

     आपली कुलीनत्वाची कल्पना इतरांपेक्षा वेगळी आहे . अध्यात्मप्रवण आणि सन्यस्त वृत्तीचा ब्राह्मण आपला आदर्श आहे . ' ब्राह्मण ' या शब्दातून मला काय सुचवायचे आहे ? ज्याला ऐहीकाचा स्पर्श नाही आणि ज्याच्या ठिकाणी शुद्ध ज्ञान प्रकाशत आहे तो ब्राह्मण . असे ब्राह्मणत्व हे हिंदू जातीचे गंतव्य आहे . 

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २४८

                       विवेकानंद अमृत २४८

     ब्राह्मण हा विधीनियमांच्या वर आहे, राजांना तो अदंड्य आहे, त्याच्या शरीराला इजा होता कामा नये, हे सारे आपण ऐकले असेल ते सत्य आहे . असे समजू नका की, स्वार्थबुद्धीने हे कोणीतरी मूर्ख लोकांना सांगितलेले आहे . ब्राह्मणत्वाची खरी कल्पना समजून घ्या म्हणजे या म्हणण्याची सत्यता तुमच्या ध्यानी येईल .  

रविवार, ६ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २४७

                         विवेकानंद अमृत २४७

     ब्राह्मण या शब्दाचा खरा अर्थ ' ज्याने स्वार्थ विसर्जित  केला आहे तो . ' ज्ञान संपादन आणि ज्ञानप्रसार यांसाठीच ज्याने जीवन वाहिले आहे असा समाज जर असेल आणि एखाद्या देशात केवळ अध्यात्मसंपन्न आणि नितीसंपन्न अशा ब्राह्मणाचीच वसती असेल तर ' न दंड्यो न च दंडीकः ' अशी स्थिती येईल ! त्या देशात कायद्याची आवश्यकता राहणार नाही यात नवल ते कोणते ? 

विवेकानंद अमृत २४६

                     विवेकानंद अमृत २४६

     महाभारतात असे लिहिले आहे की, सत्ययुगात जगात केवळ ब्राह्मणांचाच निवास होता . त्यांची जसजशी अवनती सुरु झाली तसतशा वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या . जेव्हा ह्या कालचक्राचा आणखी एक फेरा पूर्ण होईल, तेव्हा पुन्हा आपण ब्राह्मणत्वाच्या मूळ आदर्शाकडे जाऊ . आता कालचक्र त्या दिशेने फिरूही लागले आहे .

शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २४५

                  विवेकानंद अमृत २४५

     जातीव्यवस्थेचा प्रश्न हा जे आधीच  उत्क्रांतीच्या वरच्या टप्प्यावर आहेत त्यांना खाली ओढून सुटणार नाही . खाण्यापिण्याच्या चैनीत बुडून राहिल्याने, भोगवादात बुडून गेल्याने सुटणार नाही . वेदान्तिक आदर्शाप्रमाणे आपण प्रत्येकाने आध्यात्मिक झाले पाहिजे . ब्राह्मणत्व, ब्रह्मपद प्राप्त करून घेतले पाहिजे . तरच प्रश्न सुटेल .

विवेकानंद अमृत २४४

                     विवेकानंद अमृत २४४ 

     तुम्ही तथाकथित आर्य असा, अनार्य असा, ऋषीकुलोत्पन्न असा, किंवा हीन जातीत जन्माला आलेले असा . या भारतभूमीत जन्माला आलेल्यांचे विधिलिखित एकच आहे . उच्च जातीत जन्माला आलेल्यांपासून तो भंगी म्हणून जो जन्माला आला त्याच्यापर्यंत सर्वांना अखेर आदर्श ब्राह्मणत्व प्राप्त करून घ्यायचे आहे . वस्तुतः सर्व जगासाठीच हा वेदांताचा सिद्धांत सत्य आहे . 


गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २४३

                    विवेकानंद अमृत २४३

     संपूर्ण मानवतेलाच सावकाश पण निश्चितपणे एका आध्यात्मिक आदर्शाकडे जायचे आहे . तो आदर्श शांत, स्थिर, भक्तिमान, शुद्ध, अहिंसक, ध्यानशील अशा मानवाचा आहे, म्हणजे देवत्वाचाच आहे . 

मंगळवार, १ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २४२

                          विवेकानंद अमृत २४२

     हिंदुराष्ट्राचे पुनरुत्थान करण्यासाठी या राष्ट्राचा धर्म आमुलाग्र बदलला पाहिजे, नव्हे मोडून टाकला पाहिजे अशा विचारांचे काही सुधारक आज आपल्यात आहेत . त्यांच्यापैकी काही खरोखर विचारवंत आहेत . पण बहुतेक लोक आंधळेपणाने पाश्च्यात्यांचे अनुकरण करणारे आहेत, मूर्खपणाने वागणारेही आहेत. त्यांना आपण काय करतो आहोत तेही कळत नाही . अशांना परकीय कल्पना आपल्या धर्मात आणण्याविषयी फार उत्साह असतो . मूर्तीपूजेविरुद्ध एकाच धोशा त्यांनी लावलेला असतो . हिंदू धर्मात मूर्तीपूजा असल्याने हिंदुत्व सत्य नाही असा प्रचार ते करीत असतात . पण या तथाकथित ' मूर्तीपुजे ' मागे तत्व तरी काय याचा विचार ते करीत नाहीत . उगाच दुसरे लोक म्हणतात म्हणून ते हिंदुत्वावर खोटेपणाचा आरोप करतात . 

सोमवार, ३० सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २४१

                        विवेकानंद अमृत २४१

     मूर्तीपूजा चूक आहे असे म्हणण्याची एक टूमच अलीकडे निघाली आहे . मूर्तीपूजेवर कोणी अशी उथळ टीका केली तरी त्यावर साधा ' ब्र ' न काढता सर्व लोक ती मुकाट्याने गिळतात . मलाही एकेकाळी मूर्तीपूजेचा असाच राग येत असे . पण ते पाप फेडण्यासाठी मूर्तीपुजेतूनच ज्याला अद्वैत साक्षात्कार झाला अशा एका माणसाच्या पायाशी बसून धडे घ्यावे लागले . तो माणूस म्हणजे श्रीरामकृष्ण परमहंस ! 

विवेकानंद अमृत २४०

                      विवेकानंद अमृत २४०

     मूर्तीपूजेतून जर असे रामकृष्ण परमहंस निर्माण होत असतील तर आपल्याला सुधारकांची जात हवी की मुर्तीपुजकांची या प्रश्नांचे उत्तर मला आपण द्यावे . मुर्तीपुजेतून श्रीरामकृष्ण परमहंस निर्माण होत असतील तर शेकडो मूर्ती येऊ द्या . अशी श्रेष्ठ माणसे ज्या मार्गाने निर्माण करता येत असतील त्या मार्गाने निर्माण करा . 

रविवार, २९ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २३९

                      विवेकानंद अमृत २३९


     मूर्तीपूजेचा ज्याने निषेध केला त्याने  स्वतः च्या दैवताखेरीज अन्य सर्वांच्या दैवतांना निषिद्ध मानले . परमेश्वर एखाद्या प्रतीकाच्या रुपात, सुंदर रुपात प्रकट झाला तर ती भयंकर गोष्ट आहे, असे ज्या ज्यू पुरुषाने म्हटले. त्याची पूजा करणे पाप आहे असेही त्याने घोषित केले . पण देवदूत एक पेटी घेऊन चालले आहेत, त्यांच्यावर एक ढग तरंगत आहे असे जर परमेश्वराचे रूप असले तर मात्र ते पवित्र-पवित्रतम आहे ! कबुतराच्या रूपातला परमेश्वर पवित्र आणि गायीच्या रूपातला अत्यंत अपवित्र - त्याचा त्याग करा ! धिक्कार करा ! हा कोणता न्याय ?    

शनिवार, २८ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २३८

                       विवेकानंद अमृत २३८

     जगातील श्रेष्ठ प्रेषित नेहमी असे म्हणत आले आहेत की, मी जगाच्या विनाशासाठी आलेलो नाही तर ते अधिक परिपूर्ण करण्यासाठी आलो आहे . हि गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे . पुष्कळदा ही गोष्ट लक्षात न आल्याने त्यांची क्षमाशीलता ही तत्कालीन लोकप्रिय मतांशी केलेली अयोग्य तडजोड आहे अशी समजूत होऊ शकते . आजही आपण ऐकतो की, प्रेषित हे भित्रे होते आणि त्यांना जे म्हणायचे होते ते ते स्पष्टपणे म्हणू शकले नाहीत . पण हा वस्तुस्थितीचा विपर्यास आहे . 

शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २३७

                        विवेकानंद अमृत २३७

     आपल्या मुलांकडे वात्सल्याने पाहावे अशा रीतीने हे महान दृष्टे जगाकडे पाहात . त्यांची ही अथांग प्रेमशक्ती धर्मांधांच्या ध्यानी आली नाही . त्यांचे हृदय अथांग करुणेने आणि तितिक्षेने भरलेले असल्याने, प्रेमळ पिता मुलांचे अपराध जसे सोसतो तसे त्यांनी जगाचे अपराध सोसले . मानवी समाजाची प्रगती कशी व्हायला हवी याचे स्पष्ट चित्र त्यांच्या डोळ्यांपुढे होते . शांतपणे, धीराने त्यांची उपाययोजना चाललेली होती . कुणाला शिव्याशाप न देता, कुणाला भय न दाखवता, ऋजुतेने, प्रेमाने त्यांनी आपल्याला एकेक पाऊल पुढे नेले . 


बुधवार, २५ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २३६

                         विवेकानंद अमृत २३६

     उपनिषदांच्या कर्त्यांना परमेश्वराविषयींच्या जुन्या प्रचलित कल्पना या तत्कालीन विकसित नितीनियमांशी जुळणाऱ्या नव्हत्या हे त्यांना कळत होते . नास्तिक जे प्रतिपादन करत होते त्यात सत्याचा पुष्कळच अंश होता हेही ते जाणून होते . पण त्यांना हेही ठाऊक होते की, नव्याला जुन्याशी बांधणारा परंपरेचा धागा तोडून टाकला तर नवसमाजरचनेची सारी स्वप्ने फोल होतील . त्या धाग्यावाचून सारे मोती विखरून जातील . 

मंगळवार, २४ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २३५

                   विवेकानंद अमृत २३५

     पूर्वजांनी मांडलेल्या ईश्वरविषयक कल्पना निरर्थक म्हणून टाकून देण्याऐवजी त्यांतील सत्याचा शोध आपल्या ऋषींनी सुरु केला . परिणाम असा झाला की वेदांत-तत्वज्ञानाला जुनी दैवते, एकेश्वर, विश्वाचा स्वामी यांचा शोध करता करता श्रेष्ठ-श्रेष्ठतर तत्वे गवसत गेली . अद्वैत-सिद्धांताचा शोध लागला. चराचरात त्यांना एकल्या एक परब्रह्माचा साक्षात्कार झाला . 

सोमवार, २३ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २३४

                       विवेकानंद अमृत २३४

     एक भव्य सुंदर वास्तू  , गतकालीन वैभवाचा अवशेष आजही आपल्याकडे टिकून आहे . ही वास्तू दुर्लक्ष केल्याने, वावर नसल्याने पडीक होऊन राहिली आहे . भग्न झाली आहे . तिथे धूळ-कचऱ्याची पुटे जमली आहेत . काही पडझड झाली आहे . या वास्तूचे तुम्ही काय कराल ? आवश्यक ती स्वच्छता कराल,डागडुजी कराल आणि ती पूर्ववत उभी कराल की, जी आहे तीही मातीला मिळवून तिच्या जागी जिच्या पक्केपणाची काही शाश्वती देत येत नाही अशी नवी वास्तू बांधाल ? आपण या जुन्याच वास्तूची पुनर्बांधणी केली पाहिजे . पुनर्बांधणी हेच सुधारणेचे ध्येय असले पाहिजे .  

रविवार, २२ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २३३

                       विवेकानंद अमृत २३३

     आपण सर्वस्वी नवे असे काहीच निर्माण करत नसतो . काही इकडचे तिकडे करतो इतकेच . आपल्याजवळ देण्यासारखे अगदी नवे असे काही नसते . आपण काही रचना, आकृतिबंध बदलत असतो . बीजातून वृक्ष निर्माण होतो तो सावकाश, धीमेपणाने, शांतपणाने . आपणही आपल्या शक्ती ' सत्य ' उमलविण्याच्या दिशेने लावाव्यात . सत्याचे संपूर्ण प्रकटीकरण व्हावे यासाठी लावाव्यात . नवी सत्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये .  

शनिवार, २१ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २३२

                      विवेकानंद अमृत २३२

     जे सुधारक मूर्तीपूजेवर टीकेची झोड उठवितात त्यांना मी विचारतो, " बंधूंनो, कोणत्याही बाह्य गोष्टीची मदत न घेता निर्गुणाची उपासना करणे शक्य असेल तर खुशाल करा . पण ज्यांना ती तशी करता येत नाही त्यांची निंदा का म्हणून करता ? " 

विवेकानंद अमृत २३१

                        विवेकानंद अमृत २३१

     सुधारणावादी पंथ हा केवळ सुधारणा करण्यातच गुंतला तर त्याचे अस्तित्वच कालांतराने पुसले जाईल . प्रत्यक्ष प्राणचैतन्याची ओळख त्या पंथाला झाली असेल तरच तो जगेल . एकदा आवश्यक सुधारणा झाली की, त्या समाजातील विधायक शक्तीला, बलस्थानांना आवाहन केले पाहिजे . 


शुक्रवार, २० सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २३०

                        विवेकानंद अमृत २३०

     हे अमृताच्या पुत्रांनो ! माझ्या देशबांधवांनो ! आपल्या राष्ट्राची ही नौका शतकानुशतके प्रवास करीत आहे . आपल्या अमोल संस्कृतीचे देणे देऊन जगाला समृद्ध करीत आहे . जीवनसागरातून या राष्ट्रीय नौकेने आजवर अनेक शतके वाटचाल केली आहे आणि लक्षावधी जीवांना सर्व दुःखे ओलांडून पैलपार पोचविले आहे .  

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २२९

                     विवेकानंद अमृत २२९

     आपले तत्वज्ञान सांगते की, वाईट आणि चांगले हे सदैव परस्परांशी निगडीत असते . एक असले की दुसरे आहेच . त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत . समुद्रात एका ठिकाणी लाट निर्माण होते तेव्हा दुसरीकडे पाणी खोल जाते . नव्हे, सारे जीवनच तसे दुरिताने भरलेले आहे . कित्येक जीवजंतूंना मारल्याशिवाय साधा श्वास सुद्धा घेणे शक्य नाही . कोणाकडून तरी हिरावून घेतल्याशिवाय अन्नाचा एक घास खाणे शक्य नाही . जीवनाचा हाच नियम आहे . हेच तत्वज्ञान आहे .  

मंगळवार, १७ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २२८

                      विवेकानंद अमृत २२८

     अनिष्टाविरुद्धची लढाई ही फार सापेक्ष आहे . वस्तुनिष्ठ नाही . आपण कितीही बढाया मारल्या तरी अनिष्टाविरुद्धची लढाई ही आपल्या शिक्षणासाठी आहे . या विचाराने आपल्या मनाला स्वस्थता यायला पाहिजे . 

सोमवार, १६ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २२७

                      विवेकानंद अमृत २२७

     जगाच्या  इतिहासाकडे पाहिले तर ध्यानात येते की, आततायी सुधारणावाद्यांना नेहमीच पराभव पत्करावा लागला आहे . अमेरिकेत गुलामगिरी विरुद्ध जे युद्ध झाले ते स्वातंत्र्य आणि न्याय यांसाठी झालेले सर्वांत मोठे युद्ध म्हणावे लागेल. त्याचा परिणाम काय झाला ? वर्णयुद्धाच्या पूर्वी गुलामांची जी स्थिती होती त्यापेक्षा आता वाईट स्थिती आहे .  

विवेकानंद अमृत २२६

                        विवेकानंद अमृत २२६

     हिंदुस्थानातील मूर्तिपूजा ही, सगुण परमेश्वराचे अस्तित्व बुद्धाने सतत आग्रहाने नाकारले त्याची प्रतिक्रिया आहे . वेदांमध्ये मूर्तिपूजा नाही . परंतु जनक आणि मित्र अशा स्वरुपात असलेला सगुण ईश्वर हिरावून घेतला गेला त्याची प्रतिक्रिया म्हणून महापुरुषाची पूजा होऊ लागली . इतकेच काय, स्वतः बुद्धाची मूर्ती घडली आणि लाखो लोक बुद्धमूर्तीची पूजा करू लागले .  

रविवार, १५ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २२५

                         विवेकानंद अमृत २२५

     हिंदुस्थानातल्या सामान्य जनतेपर्यंत ज्ञान आणि प्रकाश यांचा वारसा पोचलेलाच नाही . युरोप गेल्या काही शतकात परिपूर्ण स्वातंत्र्याच्या दिशेने प्रवास करीत आहे . हिंदुस्थानात मात्र ' राजा कालस्य कारणम ' अशीच स्थिती राहिलेली आहे . कुल-गोत्र-वर्ण यांपासून ते काय खावे, काय खाऊ नये येथपर्यंत सर्व काही सत्ताधारीच ठरवितो . उलट पाश्चात्य देशात लोकसत्तेने सर्व व्यवहार निश्चित होतात . 

शनिवार, १४ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २२४

                         विवेकानंद अमृत २२४

     आळशी, निष्क्रिय, भोगाची लालसा धरणारे लोक जगात टिकतील तरी किती दिवस ? प्रथम पाश्चात्य जगाचा प्रवास करा . पहा आणि मग माझ्या विधानाला विरोध करा . पाश्चात्य माणसे किती उद्यमशील, कार्यनिष्ठ आहेत पहा ! जणू चैतन्याची, रजोगुणाची मूर्तरुपेच ! 


शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २२३

                       विवेकानंद अमृत २२३

     हिंदुस्थानात रजोगुण जणू अस्तित्वातच नाही . तीच गोष्ट पाश्चात्य देशात सत्वगुणाबाबत आहे . त्यामुळे पाश्चात्य देशांत हिंदुस्थानाकडून सत्वाचे अध्यात्मिकतेचे प्रवाह पोहोचायला हवेत हे निःसंशय खरे आहे . आणि दुसरीकडे हेही खरे आहे की, जोवर आम्ही रजोगुणांच्या सहाय्याने आमच्या तमोगुणावर मात करत नाही, तोवर आमचे आदिभौतिक कल्याण होण्याची सुतराम शक्यता नाही . 




गुरुवार, १२ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २२२

                     विवेकानंद अमृत २२२

     त्यागाशिवाय शांती कोणाला प्राप्त झाली आहे ? पारलौकिक हितापुढे ऐहिक हित हे नगण्य आहे हे खरेच . त्याविषयी शंका नाही . सत्वगुणाइतकेच, संपूर्ण चित्तशुद्धीइतके सामर्थ्यशाली दुसरे काय आहे ? आत्मज्ञानापुढे अन्य सर्व प्रकारचे ज्ञान हे तुच्छ आहे . 

बुधवार, ११ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २२१

                        विवेकानंद अमृत २२१

     लहान मुलाला काही आपण संन्यासधर्म शिकवू शकत नाही . त्यागाचा उपदेश करू शकत नाही . लहान मूल हे मुळातच आशावादी असते . त्याची इंद्रिये त्याचे लळे हेच त्याचे जीवन . सर्व समाजांमध्ये अशी बालवत असलेली माणसे असतात . काही सुख-आनंदाचा अनुभव त्यांना आवश्यकच असतो . 

मंगळवार, १० सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २२०

                       विवेकानंद अमृत २२०

     तुम्हाला दिसत नाही का की, सत्वगुणाच्या बुरख्याखाली हा देश तमोगुणाच्या गहन अज्ञानाच्या समुद्रात बुडत आहे ? जे मंदबुद्धी आहेत ते उच्चतम ज्ञानाच्या इच्छेचा खोटा आभास निर्माण करून आपले उणे झाकताहेत . ते उच्चतम ज्ञान सर्व कायिक, मानसिक कर्मांच्या पलीकडे आहे .  

विवेकानंद अमृत २१९

                          विवेकानंद अमृत २१९

     येथे कुणालाच स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही; पण दुसऱ्याच्या डोळ्यातल्या कुसळावर मात्र सारे उत्साहाने तुटून पडताहेत . परक्यांच्या विचारांचा चोथा चघळणे हे इथे ज्ञान मानले जाते आणि पूर्वजांची कीर्ती गाण्यात कृतार्थता मानली जाते .  


शनिवार, ७ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २१८

                        विवेकानंद अमृत २१८

     आपल्यापैकी ज्यांना परमहंसपदी पोहोचावेसे वाटते, पण त्यासाठी अद्याप सिद्धता झाली नाही अशांनी प्रथम रजोगुणाची - संतत कर्माची साधना केली पाहिजे . तेच त्यांना लाभदायक आहे . रजोगुणातून पार झाल्याशिवाय पूर्ण सत्वगुणाची प्राप्ती होणे कसे शक्य आहे ? 

विवेकानंद अमृत २१७

                       विवेकानंद अमृत २१७

     योग म्हणजे ईश्वराशी मिळून जाणे . भोगवासना जर अतृप्त राहिल्या तर ईश्वराशी मीलन शक्य तरी आहे काय ? सर्व सुखे, सर्व वासना, तुच्छ वाटू लागल्याशिवाय वैराग्य किंवा वासनारहित अवस्था येणार कशी ? आणि वैराग्य नसेल तर संन्यासाची तरी अपेक्षा धरावी कशी ? 


गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २१६

                        विवेकानंद अमृत २१६

     प्रत्येक प्रश्नाच्या थेट मुळाशी जायला हवे . त्याला मी खरी सुधारणा म्हणेन . तेथे भिडा, तेथे वणवा धगधगू द्या, त्या ज्वाळा वर जाऊ देत . मग पहा सारे हिंदुराष्ट्र कसे पेटून उठते ते ! 


विवेकानंद अमृत २१५

                      विवेकानंद अमृत २१५

     आपल्या धर्माला दोषी ठरवू नका . दोन-चार मूर्तींची पूजा केली वा न केली यामुळे काही फरक पडत नाही . मुळातला दोष आहे तो असा की, चंद्रमौळी झोपड्यांमध्ये खरा देश आहे; तो आपला पुरुषार्थ, आपली अस्मिता विसरला आहे . चैतन्याला फुंकर घातली पाहिजे - जागविले पाहिजे ! 

मंगळवार, ३ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २१४

                      विवेकानंद अमृत २१४

     त्यांच्या मनात नवनव्या प्रेरणा फुलविल्या पाहिजेत . जगात काय चालले आहे ते लख्ख नजरेने पाहायला त्यांना शिकविले पाहिजे . मग त्यांच्या मुक्तीचा मार्ग तेच शोधून काढतील . प्रत्येक राष्ट्राने, प्रत्येक पुरुषाने, प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या मुक्तीचा मार्ग स्वतःच शोधला पाहिजे .  


विवेकानंद अमृत २१३

                       विवेकानंद अमृत २१३

     आपल्या उपेक्षित बांधवांना आज हवी आहे ती केवळ प्रेरणा ! मग बाकीचे सारे आपोआप घडून येईल . आपण केवळ रसायने एकत्र करूया . त्यातून स्फटिक रचनांची किमया आपोआप घडून येईल . आज जर या देशात खरेच काही करायला हवे असेल तर ते श्रेष्ठ प्रेरणांचे संचरण ! 

सोमवार, २ सप्टेंबर, २०१३

विवेकानंद अमृत २१२

                      विवेकानंद अमृत २१२

     जेव्हा पाश्चात्य देशात शिक्षण आणि संस्कृती ही पांढरपेशा उच्चभ्रुपुरती मर्यादित न राहता समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांचे खरे आधुनिकीकरण झाले . आणि तिथपासूनच त्यांच्यात आणि हिंदुस्थान, इजिप्त, रोम यांच्या प्राचीन संस्कृतीत झपाट्याने अंतर पडत गेले . मी हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे की, शिक्षण आणि विचार यांचे अभिसरण एखाद्या देशातल्या बहुजन समाजात जसजसे होत जाईल तसतसे त्या देशाचे रूप पालटू लागते . 

विवेकानंद अमृत २११

                         विवेकानंद अमृत २११

     हिंदुस्थानात शिक्षण ही एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी झाली . अहंमन्य वृत्तीने आणि राजसत्तेच्या बळावर काही मूठभर माणसांनी येथील सर्वसामान्य माणसांना अमोल विचारधनापासून वंचित ठेवले . हिंदुस्थानचे उत्थान पुनश्च एकवार घडवायचे असेल तर बहुजनसमाजात फार मोठा शिक्षणाचा प्रसार करायला हवा . 

शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत २१०

                        विवेकानंद अमृत २१०

     मुसलमान या देशात आले तेव्हा त्यांनी किती शिपाई बरोबर आणले होते ? या देशावर राज्य करणारे ब्रिटीश तरी संख्येने किती आहेत ? चार रुपड्यासाठी आपल्या रक्तामांसाच्या भाऊबंदांचे गळे कापणारे मुर्दाड लोक या दुर्दैवी देशावाचून कोठे बरे सापडतील ? सातशे वर्षांच्या मुसलमानी अमलात सहा कोटी मुसलमान झाले आणि शंभर वर्षांच्या ब्रिटीश अमदानीत वीस लाख ख्रिस्ती झाले ! असे का घडले ? 

विवेकानंद अमृत २०९

                         विवेकानंद अमृत २०९

     शिक्षण, शिक्षण आणि शिक्षण ! एवढेच याचे उत्तर ! युरोपातील नाना शहरात मी फिरलो . अगदी सामान्य माणसांनाही ज्या सुविधा उपलब्ध आहेत त्या मी पाहिल्या . त्या तुलनेत आपल्या देशातील दरिद्री बांधवांची स्थिती मनापुढे येई आणि मला आसवे अनावर होत . त्यांच्यात आणि आपल्यात असा फरक का ? केवळ शिक्षणामुळे . शिक्षणातून आत्मश्रद्धेचा जन्म होतो .  

गुरुवार, २९ ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत २०८

                         विवेकानंद अमृत २०८

     आपल्या पुराणातल्या तेहतीस कोटी देवांवर आणि परकीयांनी आपल्यात घुसवलेल्या आणखी देवदेवतांवरही जरी तुमचा विश्वास असेल; पण स्वतःच्या ठायी मात्र अविश्वास असेल तर तुमच्या नशिबी मुक्ती लिहिलेली नाही . आधी स्वतःवर श्रद्धा ठेवा . त्या श्रद्धेच्या शिळेवर दृढपणे उभे राहा . सामर्थ्यसंपन्न व्हा ! आजची आवश्यकता जर काही असेल तर ती ही आहे .  

विवेकानंद अमृत २०७

                   विवेकानंद अमृत २०७

     मला स्पष्ट दिसत आहे की, ही कर्मप्रवणता आणि आत्मश्रद्धा माझ्या देशबांधवांमध्ये वेळीच उत्पन्न व्हायला हवी आहे . त्यावाचून गत्यंतर नाही . दृष्ट्या माणसांना येणाऱ्या तीन युगांचे दर्शन आधीच होत असते . श्रीरामकृष्णाच्या अवतरणापासूनच पूर्वेचे क्षितीज उगवत्या सूर्याच्या किरणांनी उजळलेले आहे . हळूहळू तो सूर्य माध्यान्हीचा होऊन साऱ्या देशाला वैभवशाली आणि प्रकाशमान करील . 

मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत २०६

                            विवेकानंद अमृत २०६

     हिंदुस्थानचे पुनरुत्थान होणारच . ते विजयपदी विराजमान होणारच . पण तलवारीच्या जोरावर नव्हे; तर अध्यात्मशक्तीच्या बलाने ! संहाराचा उन्मत्त ध्वज घेऊन नव्हे , तर शांती आणि प्रीती यांचा, सन्यासवस्त्रांच्या अरुण उज्ज्वल रंगाचा ध्वज मिरवीत !

रविवार, २५ ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत २०५

                    विवेकानंद अमृत २०५

      स्वतःमधल्या देवत्वाला आवाहन करा . मग क्षुधा, तृष्णा, शीतोष्णादी सुखदुःखे तुम्हाला स्पर्शही करू शकणार नाहीत . विलासमय प्रासादात सारी सुखे पायाशी हात जोडून उभी असताना चवीला आपली थोडी धर्मचर्चा करावी हा हिंदुस्थानचा स्वभाव नाही . हिंदुस्थान धर्माकडे अधिक सखोलपणे, गांभीर्याने पाहतो . जे वरवरचे, कमअस्सल आहे ते त्याला लगेच कळते . म्हणून त्यागाला सिद्ध राहा . श्रेष्ठता प्राप्त करा . 

विवेकानंद अमृत २०४

                        विवेकानंद अमृत २०४

     त्यागावाचून श्रेष्ठ कार्ये सिद्धीस जात नाहीत . सर्व सुखविलास, उपभोग, कीर्ती, प्रतिष्ठा आणि मानमरातब यांना तिलांजली द्या . स्वतःच्या तन-मन-जीवनाचे समर्पण करून असा सेतू बांधा की, ज्यावरून लक्षावधी लोक भवपार जातील . सर्व शुभशक्ती संघटित करा. श्रेयाची अपेक्षाच धरू नका . 

शनिवार, २४ ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत २०३

                     विवेकानंद अमृत २०३

     ज्या ध्वजाला तुम्ही अनुसरत असाल तो हिरवा आहे की निळा की तांबडा याची चिंता करू नका . सर्व रंगांच्या संगमातून शुभ्रतेचा-प्रीतीचा एकच एक रंग-एकच दिव्यद्युती निर्माण होऊ दे ! जीव ओतून आपण केवळ काम करायचे . फलाची चिंता करायची नाही ते आपोआप प्रकटेल .  


शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत २०२

                           विवेकानंद अमृत २०२

     मी भविष्यात डोकावण्याचा खटाटोप करत नाही . त्याची मला जरूरच वाटत नाही . मात्र एक उज्ज्वल दृश्य मला स्पष्टपणे दिसत आहे . ती चिरपुरातन मातृदेवता पुनरपी जागी झाली आहे . आपल्या श्रेष्ठ सिंहासनावर ती आरूढ झाली आहे आणि सर्वगौरवाने तळपत आहे . शांतिमंत्रांनी आणि आशिर्वचांनी तिच्या आगमनाची त्रिभुवनाला ग्वाही देऊ या . 





     

बुधवार, २१ ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत २०१

                       विवेकानंद अमृत २०१

     तुमच्याजवळ भाव आहे का ? बुद्धी आणि तर्क यांत काय आहे ? -- त्यांची धाव फार मर्यादित आहे . पण हृदयात मात्र स्फूर्तीचा उचंबळता झरा आहे . म्हणून हृदयाला सर्वाधिक महत्व आहे . देव भावाने भेटतो, बुद्धीने नाही ! बुद्धी फार तर आपल्यापुढचा मार्ग मोकळा करते . तिचे कार्य पोलीसासारखे आहे . पण पोलिस हे काही समाजाचे अनिवार्य अंग नव्हे . पोलिस गुन्हा करू देणार नाही, गोंधळ माजू देणार नाही . बुद्धीचेही काम एवढेच आहे . बुद्धीला डोळे नाहीत . हात आणि पायही नाहीत . ती स्वतःहून काहीच करू शकत नाही . भावना ही खरोखर चैतन्यमयी आहे . भावना विजेहून अधिक वेगाने काम करते . 

मंगळवार, २० ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत २००

                       विवेकानंद अमृत २००

     बुद्धीची आवश्यकता आहेच . ती नसेल तर आपण चुका करू, धडपडू , ठेचाळू , पण चुका टाळणे यापलीकडे बुद्धीचे काही काम आहे असे समजू नका . तिची मदत आहे, पण ती निष्क्रिय . तिचे स्थान दुय्यम . खरे काम तर भावनेचेच आहे-हृदयाचेच आहे . 

सोमवार, १९ ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत १९९

                        विवेकानंद अमृत १९९ 

     येथील असह्य वेदना तुमच्या रक्तात मिसळून तुमच्या धमन्यातून वहात तुमच्या हृत्स्पंदांशी एकरूप झाली आहे का ? या वेदनेने तुम्ही वेडेपिसे झाले झाला आहत का ? ती दूर करण्यासाठी यश-कीर्ती, पत्नी-मुले, इतकेच नव्हे तर सर्वस्वाचे समर्पण करण्याची तुमची तयारी आहे काय ? 

रविवार, १८ ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत १९८

                       विवेकानंद अमृत १९८

     शुद्ध प्रेमाने साध्य होत नाही असे काय आहे ? विश्वातील सारी रहस्ये उलगडणारी गुरुकिल्ली प्रेमात आहे . म्हणून सुधारणा करण्याची आकांक्षा धरणाऱ्या माझ्या देशप्रेमी मित्रांनो ! आधी निरपेक्ष प्रेम करायला शिका . देव-देवता आणि ज्ञानी ऋषी यांची ही लक्षावधी मुले पशुतुल्य जिणे जगत आहेत . हे पाहून तुमच्या काळजाला वेदना होतात का ? शतकानुशतके उपाशी-अर्धपोटी राहणाऱ्या या लक्षावधी बांधवाबद्धल तुमच्या पोटी आच आहे का ? या भूमीला घेरून असलेले अज्ञान तुम्हाला बेचैन करते काय ? त्यामुळे तुम्हाला झोपही लागत नाही असे होते का ?   

विवेकानंद अमृत १९७

                         विवेकानंद अमृत १९७

     विपन्नता आणि अज्ञान यांच्या गर्तेत पिचणाऱ्या आपल्या लक्षावधी बांधवांसाठी कोणाचे काळीज तुटते काय ? आपणही माणसे आहोत हेच ते विसरले आहेत व परिणामतः गुलामीचे जिणे जगताहेत . जाणते लोक हे सारे पाहताहेत, पण त्याचे खापर त्यांनी हिंदूधर्माच्याच माथी मारले आहे . आणि या विपन्न बांधवांना सुधारण्याचा एकमेव मार्ग म्हणजे धर्मावर कुऱ्हाड घालणे असे ते समजतात .   
     कृपा करून मी काय म्हणतो ते ऐका . परमेश्वर कृपेने मी यातले रहस्य शोधून काढले आहे . हा दोष धर्माचा नव्हेच नव्हे . याच्यावर कसले खापर फोडू नका . 

शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत १९६

                           विवेकानंद अमृत १९६

      खरे म्हणजे या धर्माने आपल्याला शिकविले आहे की, प्रत्येक जीव हे तुझ्या ठायी असलेल्या आत्म्याचेच दुसरे रूप आहे . तुमच्याच त्या प्रतिकृती आहेत . परंतु या सांगाव्याचे आचरण आपल्या हातून घडले नाही . कारण सह्भावाचा-ओलाव्याचा अभाव ! दरिद्री, दुःखी, पतित यांच्याशी जिव्हाळ्याने कसे वागावे हे तुम्हाला शिकविण्यासाठी परमेश्वराने भगवान बुद्धांचा अवतार घेतला . 

विवेकानंद अमृत १९५

                         विवेकानंद अमृत १९५ 

     मानवाच्या श्रेष्ठतेचा उदघोष एवढ्या कंठरवाने हिंदू धर्माखेरीज अन्य कोणत्याही धर्माने केलेला नाही . आणि दीनदलितांची धर्माच्या नावाने पिळवणूक करण्याइतकी परमकोटीची हीनताही जगातल्या अन्य कोणत्या धर्माने दाखविलेली नाही . परमेश्वराने मला सांगितले आहे की, धर्म निर्दोष आहे ; दोषी आहेत धर्माचा व्यापार करणारे दलाल ! त्यांनी ढोंगीपणाने पारमार्थिकाची आणि व्यावहारिकाची फारकत केली आहे . 

बुधवार, १४ ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत १९४.

                        विवेकानंद अमृत १९४

     या मृतप्राय समाजात तुम्ही नवे चैतन्य ओतू शकाल ? इथली स्फूर्ती मेली आहे , भविष्याची सर्व आशा निमाली आहे . जे कोणी भले करायला जातील त्यांच्यावरच उसळून उलटण्याची मनोवृत्ती येथे आहे . लाथा झाडणाऱ्या चिडखोर मुलाला औषध पाजणाऱ्या वैद्याची भूमिका तुम्हाला करावी लागेल . आहे तयारी ? 

मंगळवार, १३ ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत १९३

                         विवेकानंद अमृत १९३ 

     मी असे ऐकले आहे की, जपानी मुलींची अशी समजूत असते की, आपल्या बाहुल्यांवर खूप जीवापासून प्रेम केले तर त्या जिवंत होतात . म्हणून जपानी मुलगी आपल्या बाहुलीला जीवापाड जपते . माझीही अशी श्रद्धा आहे की भुकेकंगाल, निर्धन, अविवेकी, पतित, भांडखोर आणि मत्सरी अशा या समाजावर जर का कोणी सर्वांतःकरणपूर्वक प्रेम करतील तर हा समाज जागृत होईल . विशाल अंतःकरणाचे शतावधी स्त्री-पुरुष जर सर्व जीवनभोगांचा त्याग करून त्यांच्या सर्व शक्ती आपल्या लक्षावधी देशबांधवांच्या कल्याणार्थ समर्पण करतील तर अवनती आणि अज्ञान यांच्या भोवऱ्यात खोल खोल जात चाललेला हा समाज खात्रीने वर येईल .   

विवेकानंद अमृत १९२

                      विवेकानंद अमृत १९२ 

     संपूर्ण तादात्म्यतेची भावना ही झाली पहिली पायरी. नंतर परिस्थितीवर योग्य तोडगा शोधून काढला पाहिजे . आपल्या परंपरेतील जुन्या कल्पना म्हणजे तुम्हाला निव्वळ अंधश्रद्धा वाटत असणे शक्य आहे . पण त्यात सत्याचे सुवर्णकण लपलेले आहेत .  

रविवार, ११ ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत १९१

                         विवेकानंद अमृत १९१ 

     केवळ पोकळ गप्पांमध्ये शक्तीचा अपव्यय करण्याऐवजी तुम्ही एखादा प्रत्यक्ष उपाय शोधून काढला आहे काय ? हे लोक जिवंतपणी ज्या यमयातना भोगीत आहेत त्या हलक्या करण्यासाठी सांत्वनाचे चार गोड शब्द तुम्ही त्यांच्याशी बोलला काय ? की केवळ टीकाच करता ? 
     जर तुम्ही मधुर शब्द बोलत असाल तर ती दुसरी पायरी झाली . आणखी एक गोष्ट आवश्यक आहे . हे सारे तुम्ही का करता ? पैसा, कीर्ती किवा सत्ता यांच्या लालसेपोटी हे कर्म नाही याविषयी तुमची खात्री आहे ना ? आपला हेतू शुद्धच पाहिजे .  

शनिवार, १० ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत १९०

                           विवेकानंद अमृत १९० 

     जाणते लोक निंदा करोत वा वाखाणोत; लक्ष्मी घरी स्थिर राहो वा अन्यत्र जावो; मृत्यू आज येवो वा अनेक युगांनी येवो - धैर्यवान पुरुष सत्यमार्गावरून तिळमात्र ढळत नाहीत . असा कणखरपणा तुमच्या ठायी आहे ? 
     एवढ्या तीन गोष्टी तुमच्याकडे असल्या तर तुमच्यापैकी प्रत्येकजण अद्भुत कार्य करू शकेल . वृत्तपत्रात मोठमोठे लेख लिहिणे, लांब - लांब व्याख्याने देणे याची काय आवश्यकता ? तुमचे भावच तुमच्या मुद्रेवर विलसू लागतील . तुम्ही गुहेत राहत असाल तर पाषाणशिलांना भेदून तुमचे विचार जगभर पोहोचतील . शतकानुशतके घुमत राहतील . 

शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत १८९

                         विवेकानंद अमृत १८९

     समर्पण हे काही एका दिवसाचे काम नाही . मार्ग तर भयंकर काट्याकुट्यांनी भरलेला आहे . पण जो पार्थाचा-अर्जुनाचा सारथी झाला, तो आपल्यालाही मार्ग दाखवायला सिद्ध आहे . त्याच्यावरील श्रद्धेची एक चिंगारी हिंदुस्थानच्या शतकानुशतकांच्या व्यथेवर टाकताच ती पर्वतप्राय व्यथा क्षणार्धात भस्म होईल .  

विवेकानंद अमृत १८८

                      विवेकानंद अमृत १८८ 

     जो अकिंचन गोपालांचा सखा झाला, अंत्यज गुह्काला ज्याने स्नेह्भराने आलिंगन दिले ., बुद्धावतारात भल्याभल्यांची निमंत्रणे बाजूला सारून ज्याने एका वेश्येचे निमंत्रण स्वीकारले आणि तिचा उद्धार केला त्या भगवान पार्थसारथीच्या मंदिरात जा . त्यांच्या शुभचरणी नतमस्तक व्हा आणि आपले सारे जीवन समर्पण करा ! भगवान पुनः पुन्हा ज्यांच्यासाठी अवतार घेतात त्यांच्या कारणी ते जीवन लागू द्या ! दीन, पतित, अत्याचारित यांचा तो कैवारी . तुम्हीही प्रतिज्ञा करा की, दिवसेंदिवस गर्तेत चाललेल्या त्या पददलीतांसाठी आम्ही आपली जीवने अर्पण करू !   

बुधवार, ७ ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत १८७

                         विवेकानंद अमृत १८७ 

     उठा ! या महान कार्याच्या पूर्ततेसाठी सिद्ध व्हा ! त्यासाठी महत्तमत्व अंगी बाणले पाहिजे . आपण प्रकाशाचे पुत्र, अमृताचे वारस आहोत ! परमेश्वराचे पुत्र यशस्वी होणारच ! या धर्मयुद्धात शेकडो योद्धे कामी येतील . त्यांची जागा घेण्यासाठी शेकडो पुढे येतील . मला कदाचित याचि देही यशःप्राप्ती पाहता येणार नाही . पण माझ्यानंतरचे लोक ही धुरा खांद्यावर घेतील . 

विवेकानंद अमृत १८६

                        विवेकानंद अमृत १८६ 

     आपल्याला दुखःनिदान झाले . उपायही सापडला . आता आवश्यकता आहे श्रद्धेची . जे तथाकथित श्रेष्ठ नि श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका . तर्ककर्कश लेखणी चालविणाऱ्यांची खुशाल उपेक्षा करा . त्यांच्या हृदयशून्य वृत्तपत्रीय चिकित्सेकडे ढुंकूनही पाहू नका . 
     ज्वलंत श्रद्धा आणि ज्वलंत सहानुभाव एवढेच महत्वाचे आहे . श्रद्धा, श्रद्धा ! केवळ आत्मश्रद्धा हवी . ईश्वरश्रद्धा हवी . साऱ्या महत्तमत्वाचे रहस्य या श्रद्धेत आहे .  

सोमवार, ५ ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत १८५

                      विवेकानंद अमृत १८५ 

     ज्याचा स्वतःवरच विश्वास नाही तो नास्तिक होय . ते  सुंदर कठोपनिषद तुम्ही वाचले आहे का ? एका राजाने एकदा एक मोठा यज्ञ सुरु केला . यज्ञात खरे म्हणजे सर्वोत्तम वस्तूंचे दान करायचे असते . पण या राजाने वांझ गायी आणि निरुपयोगी घोडे यांचे दान करायला सुरुवात केली . हे पाहून नचिकेताच्या मनात श्रद्धेचा उदय झाला . श्रद्धा हा शब्द नीट समजून घेतला पाहिजे . हा एक अद्भुत शब्द आहे . नचिकेताच्या मनात श्रद्धेचा उदेजल्याबरोबर काय झाले ? तो स्वतःशीच म्हणाला,


बहूनामेमि प्रथमो बहूनामेमि मध्यमः |
किं स्विद्यमस्य कर्तव्यं यन्मया द्य करिष्यति ||  

     मी कितीकांहून श्रेष्ठ आहे . काही थोडे माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत हे खरे, पण मी अगदीच काही शेवटचा नाही . मी खात्रीने काही करू शकतो .  

रविवार, ४ ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत १८४

                       विवेकानंद अमृत १८४ 

     नचिकेताने ठरविले की, आपल्या मनात जो प्रश्न आहे त्याची उकल करून घ्यायची . हा प्रश्न होता मृत्युच्या रहस्याचा . आणि तो केवळ यमराजाकडे जाऊनच सोडविणे शक्य होते . आणि हा मुलगा गेला की यमराजाकडे ! धैर्यशील नचिकेत मृत्युराजाच्या दारात तीन दिवस धरणे धरून बसला होता . त्याची आकांक्षा कशी पूर्ण झाली हे आपण जाणताच . 
     अशी श्रद्धा आपल्यात प्रविष्ट होऊ दे . पाश्चिमात्याकडे जे भौतिक सामर्थ्य आपल्याला दिसते ते त्यांनी स्वठ्च्या शरीरबलावर श्रद्धा ठेवल्यामुळे त्यांना प्राप्त झाले आहे . तुम्ही आत्मबलावर श्रद्धा ठेवा आणि पहा किती पटीने ती श्रद्धा कार्यान्वित होते ती ! 




शनिवार, ३ ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत १८३

                          विवेकानंद अमृत १८३ 

     बस्स !अशी श्रद्धा मला हवी आहे . अशी श्रद्धा तुमच्यात उदेजू दे . ही श्रद्धा मिळविणे हेच मोठे आह्वान आहे . गांभीर्याचा अभाव, ज्या त्या गोष्टींची टिंगल करणे हा एक भयंकर रोग या देशाच्या रक्तात शिरला आहे . झडझडून झाडून टाका तो . शक्तिमान बना ; श्रद्धावान बना, मग सारे यश तुमच्या पायाशी चालत येईल . 

विवेकानंद अमृत १८२

                         विवेकानंद अमृत १८२

      एकदा कामाला भिडा तर खरे, मग तुम्हाला कळेल की, अशा विलक्षण शक्तीचा आपल्यात संचार होत आहे की ती पेलून धरणे कठीण ! दुसऱ्यासाठी केलेली छोटी गोष्टसुद्धा आपल्यात एक शक्ती जागवित असते . दुसऱ्यांचे अल्पसे शुभ चिंतिले तरीही हृदयात वनराजाचे सामर्थ्य जागृत होते . 

गुरुवार, १ ऑगस्ट, २०१३

विवेकानंद अमृत १८१

                         विवेकानंद अमृत १८१ 

     मुळात आवश्यक गोष्ट जर काही असेल तर ती म्हणजे त्याग . सर्वस्वाचा त्याग केल्याशिवाय कुणीही लोकहितार्थ स्वतःला झोकून देऊ शकत नाही . असा परित्यागीच सर्वांकडे समदृष्टीने पाहू शकतो आणि सर्वांची समभावाने सेवा करतो .