मंगळवार, २१ जुलै, २०२०

५९ प्रतिज्ञा

                                                ५९  प्रतिज्ञा 
         संस्कारामुळे मनुष्य व्दिज अर्थात दोन जन्मवाला होतो. आपल्या संघ दृष्टिकोनातून स्वयंसेवकांची प्रतिज्ञा झाली कि त्याचा दुसरा जन्म झाला असे मानले पाहिजे. प्रतिज्ञापूर्व काळात आमच्या मनात संसाराविषयी विशेष भाव होते. परंतु आज जीवनातील सर्व पवित्र वस्तु व भावनांना साक्षी ठेवून, खाणे-पिणे, मौजमजा करण्याचे पाशवी मार्ग सोडून मानवी जीवनात प्रवेश केला आहे व आपल्या कर्तव्याचे शिक्षण घेण्याचा संकल्प केला आहे.         
                                                                                                                                         - पू . श्रीगुरुजी
            समाजाबरोबर एकात्म होण्याची भूमिका व्यवहारात आणणे हाच प्रतिज्ञेचा उद्देश आहे.  चहुबाजूला निराशेचे वातावरण असूनही आम्हाला समर्थ, संघटीत आणि अवघ्या विश्वाला मार्गदर्शन करण्याची क्षमता असणाऱ्या हिंदुराष्ट्राचे पुनरुत्थान करावयाचे आहे. कर्तव्यविन्मुख होण्याचा प्रसंग आलाच तर स्वतःला सावरण्याचे एक साधन म्हणजे आपली प्रतिज्ञा होय.                                                                                          - बाबासाहेब आपटे
          आयुष्यात निर्माण होणाऱ्या एखाद्या कमकुवत क्षणी ध्येयापासून ढळू नये म्हणून प्रतिज्ञा घ्यावयाची. ती केवळ थोर लोकांनीच करावयाची गोष्ट नव्हे. संघकार्य हे समाजातील सध्याच्या प्रचलीत प्रवाहाविरुद्ध असल्याने ध्येयनिष्ठ जीवन जगणारा यशस्वी कार्यकर्ता होण्यासाठी प्रतिज्ञा करावयाची.               -  मा. दामुअण्णा दाते   

         जीवनात प्रतिज्ञा एकच असू शकते. म्हणून यावज्जीव, आमरणान्त त्या प्रतिज्ञाचे पालन करण्याची इच्छा व्यक्त करून आपण आपल्या कार्यात प्रवेश करतो. जेव्हा स्वयंसेवकाला असा विश्वास उत्पन्न होतो की, आपल्या सर्व भावभावना, विचार आचार संघाच्या विचारधारेशी अनुकूल बनविण्यात तो यशस्वी झाला आहे. तसेच भविष्यातही त्यात तो पूर्ण तया सफल होईल तेव्हाच तो यथार्थरित्या ' मी संघाचा स्वयंसेवक आहे ' अर्थात संघाचा घटक अवयव आहे असे आपल्या समग्र पवित्र स्मृतीना जागृत करून प्रकट रूपाने म्हणतो. यालाच आपण प्रतिज्ञा म्हटले आहे.

       कधी कधी स्वयंसेवकांच्या मनात संघाला काही दान करावे असा विचार येतो. पण दान करणारा तो कोण ? एकदा स्वयंसेवक झाला म्हणजे तो स्वतः संघाचा होत असतो. मग त्याच्याजवळ दान करण्यासाठी उरतेच काय ? आणि मग पैसे देऊन स्वयंसेवकाची आपल्या कर्तव्यातून सुटका होत नाही. कारण ' काया वाचा किंवा मनाने ' आहे असे आपण प्रतिज्ञात म्हटलेले नाही तर तिथे तन-मन-धनाचा एकत्रित उल्लेख आहे. आपली सर्व ऐच्छिक सुख संपत्ती संघ कार्यासाठी देईन अशीच भावना या एकत्रित उल्लेखात आहे. यालाच म्हणायचे समर्पण.                                                                                                                                परमपूजनीय श्रीगुरुजी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा