बुधवार, ३० ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २७१

                    विवेकानंद अमृत २७१

     काही वेळा हिंदुस्थानातल्या तरुणांना वाटते की, पारमार्थिक हिताच्या धूसर कल्पनांमागे लागून आपण इहलोकांतल्या जीवनाची चव हरवून बसतो आहोत . पण पुन्हा ते भारून टाकणारे शब्द त्यांच्या कानी येऊ लागतात . 

इति संसारे स्फ़ुटतर दोषः कथमिह मानव तव संतोषः |  

     हे मानवा ! या मर्त्य, भंगुर जगात तुला आनंद कोठून सापडणार ? 

मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २७०

                        विवेकानंद अमृत २७०

     एकीकडे नवभारताला वाटत आहे की, पाश्चात्य देश जे करतात ते निःसंशय चांगलेच असले पाहिजे . एरवी त्यांनी एवढी प्रगती कशी केली असती ? दुसरीकडे सनातन भारत म्हणतो आहे, " अरे, वीज मोठ्या दिमाखाने झळाळते - पण क्षणभरच ! ती तुमचे डोळे दिपवून टाकत आहे . सावध व्हा . "  

सोमवार, २८ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २६९

                         विवेकानंद अमृत २६९

     आपल्याला खूपच गोष्टी शिकायच्या आहेत . मरेपर्यंत नव्या आणि श्रेष्ठ गोष्टी शिकण्यासाठी धडपडत राहिले पाहिजे. असे धडपडणे हेच मनुष्यजीवनाचे सार आहे . 

विवेकानंद अमृत २६८

                    विवेकानंद अमृत २६८

     माझ्या हिंदुस्थाना ! तुला धोका आहे तो इथेच . पाश्च्यात्यांच्या अंधानुकरणाचा तुला एवढा मोठा शाप आहे की, एखादी गोष्ट चांगली की वाईट हे बुद्धीच्या, विवेकाच्या किंवा शास्त्राच्या साहाय्याने तू ठरवतच नाहीस . गोरी माणसे जे रीतीरिवाज पाळतात, ज्या कल्पना मनाशी बाळगतात त्याच चांगल्या; त्यांना जे आवडत नाही ते ते सारे वाईट ! अरेरे, बुद्धीभ्रष्टतेचा, मूर्खपणाचा याहून आणखी कोणता पुरावा हवा ? 

रविवार, २७ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २६७

                         विवेकानंद अमृत २६७

     आपण आपल्या स्वभावानुसार प्रगती केली पाहिजे . विदेशी समाजांनी आपल्यावर जे कलम केले आहे त्यानुसार वाढण्यासाठी प्रयत्न करणे हे निष्फळ होय . हिंदुस्थानला मोडून, मुरगळून इतर राष्ट्रांच्या साच्यात घालणेच अशक्य आहे . परमेश्वराची ही केवढी कृपा !

शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २६६

                        विवेकानंद अमृत २६६

     इतर समाजामध्ये ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांना मी नवे ठेवीत नाही . त्यांच्यापुरत्या त्या चांगल्या असतील, पण आपल्या दृष्टीने नाहीत . त्याच्या दृष्टीने जे अमृत आहे ते आपल्या दृष्टीने विष असू शकेल हे सर्वात प्रारंभी ध्यानात ठेवले पाहिजे . त्यांची शास्त्रे, त्यांच्या संस्था, त्यांच्या परंपरा या सर्वांतून त्यांची आजची समाजव्यवस्था घडली आहे . आपल्या पाठीशी आपली सहस्रो वर्षांची परंपरा, सहस्रो वर्षांचे संचित आहे . ते आपल्या नसानसांतून वाहात आहे . त्यातूनच आपला स्वभाव घडला आहे व त्याच मार्गाने जाणे आपणास हितावह होय . 


विवेकानंद अमृत २६५

                      विवेकानंद अमृत २६५ 

     सामाजिक जीवन सामान्यतः पुढील दोनपैकी एका गोष्टीवर आधारलेले असते . एकतर धर्म किंवा त्या त्या समाजाची गरज . एक आध्यात्मावर आधारलेले आहे, तर दुसरे इहवादावर आधारलेले आहे . एक परतत्वस्पर्शी आहे, तर दुसरे वास्तव आहे . एक या लहानशा लौकिक जगाची क्षितिजे ओलांडून पलीकडचे पहाते आणि या लौकिक जगापलीकडच्या पारलौकिक जीवनास प्रारंभ करण्याची निर्भयता त्याच्याजवळ असते . दुसरे याच जगात पाय रोउन उभे राहते आणि येथेच दृढमूल होण्यासाठी प्रयत्न करते .  


बुधवार, २३ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २६४

                      विवेकानंद अमृत २६४

     दोन प्रकारच्या संस्कृती . एक धर्मावर आधारलेली, अंतर्मुखतेचा पुरस्कार करणारी हिंदू संस्कृती . आणि दुसरी विज्ञानावर आधारलेली, बाह्य सृष्टीत रमलेली पाश्चिमात्य संस्कृती . पाश्चात्यांना सामाजिक सुधारणामधून आध्यात्मिकता यायला हवी असते . पौर्वात्यांना सामाजिक अधिकार हे अध्यात्मिकातेतून आले तरच मान्य असतात . 

मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २६३

                  विवेकानंद अमृत २६३

     आधुनिक सुधारणावाद्यांना हिंदुस्थानातील धर्माची मोडतोड केल्यावाचून सामाजिक सुधारणा करणे अशक्य वाटू लागले . त्यांनी तसा प्रयत्न केला पण तो सपशेल फसला . कारण त्यांच्यापैकी फारच थोड्यांनी स्वतः च्या धर्माचा अभ्यास केला होता आणि सर्व धर्माची जननी असलेल्या आपल्या धर्माचे शिक्षण, त्यासाठी आवश्यक ती साधना तर एकाचीही झाली नव्हती . 

विवेकानंद अमृत २६२

                  विवेकानंद अमृत २६२

     मी छातीठोकपाने सांगतो की, हिंदू समाजाच्या उन्नतीसाठी धर्माच्या विनाशाची काहीएक आवश्यकता नाही . आजची अवनती ही धर्मामुळे झालेली नसून धर्मतत्वांचे योग्य रीतीने पालन न झाल्यानेच झाली आहे . 

रविवार, २० ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २६१

                   विवेकानंद अमृत २६१

     निःस्वार्थ बुद्धीने ज्यांनी समाजसुधारणेचे प्रयत्न केले त्यांची दिशा चुकलेली असली तरी ते आदरालाच प्राप्त आहेत . या सुप्त समाजपुरुषाला जागविण्यासाठी सुधारणांचे ते धक्के आवश्यकच होते . पण ते विधायक नव्हते, नकारात्मक होते . म्हणून ते नामशेष झाले . 

विवेकानंद अमृत २६०

                       विवेकानंद अमृत २६०

     सर्व दर्शनी उत्क्रांती ही अंतर्गत प्रक्रियांची बाह्य परिणती असते हे त्यांनी ध्यानी घेतले नाही . बीज हे भोवतालच्या जगतातून प्रकाश, पाणी अशा गोष्टी ग्रहण करते, परंतु वाढते ते विशिष्ट जातीचा वृक्ष म्हणूनच . हिंदू जाती ही संपूर्णपणे नष्ट झाली आणि एक दुसरीच जाती, दुसराच समाज येथे निर्माण झाला तरच हिंदुस्थानचा युरोप होईल . एरवी ते कालत्रयी शक्य नाही .  

शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २५९

                      विवेकानंद अमृत २५९

     आमच्या सुधारणावादी चळवळीनी पाश्चात्य सुधारणावाद्यांच्या  चळवळीची अविचारी नक्कल केली; पण त्या पद्धती हिंदुस्थानात उपयोगी नाहीत हे त्यांच्या लक्षात आले नाही . म्हणून आपल्याकडच्या सुधारणावादी  चळवळीना यश लाभले नाही . इतिहासकालापासून आपला जो समाजिक स्वभाव घडत आला आहे त्याचे जतन केलेच पाहिजे . 

गुरुवार, १७ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २५८

                         विवेकानंद अमृत २५८

    प्रत्येक गोष्टीतील आवश्यक भाग कोणता आणि अनावश्यक भाग कोणता याचा विवेक करायला शिकणे आवश्यक आहे . गाभा हा शाश्वत असतो. अन्य गोष्टी या काही मर्यादित काळापुरत्या महत्वाच्या असतात . 
     जातीव्यवस्था ही सतत बदलत आली आहे . संस्कार-समारंभाचे स्वरूप बदलत आले आहे . धर्माचे बाह्य स्वरूपच बदलत आले आहे . मात्र सार, सत्व आणि तत्व बदललेले नाही ! आपल्या धर्माचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला वेदांचाच अभ्यास करावा लागतो . 

बुधवार, १६ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २५७

                        विवेकानंद अमृत २५७

     वेदांत सांगितलेली सत्ये शाश्वत आहेत . ती सार्वकालिक आहेत . पण स्मृती मात्र कालसापेक्ष आहेत . जसजसा कालौघ पुढे जाईल तसतशा नवनव्या स्मृती येतच राहतील . नवनवीन ऋषी अवतरतील . ते समाजाचे रूप बदलतील, त्याला चांगली दिशा देतील . नव्या मनुला साजेलसा नवा कर्तव्यधर्म सांगतील . 

विवेकानंद अमृत २५६

                       विवेकानंद अमृत २५६

     या देशाच्या भूतकाळात अनेक श्रेष्ठ गोष्टी घडल्या आहेत . भविष्यकाळात याहून श्रेष्ठतर गोष्टी घडवावयास खूप वाव आहे . माझी खात्री आहे की, आपली वाटचाल थांबलेली नाही . जो थांबला तो संपला . एकतर आपल्याला पुढे गेले पाहिजे किंवा मागे आले पाहिजे . एकतर प्रगती केली पाहिजे किंवा नष्ट झाले पाहिजे . आपल्या पूर्वजांनी भूतकाळात अनेक पराक्रमाची कृत्ये केली . पण आपण त्यांच्याही पुढे गेले पाहिजे . त्यांच्याहून मोठे पराक्रम केले पाहिजेत . 

मंगळवार, १५ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २५५

                        विवेकानंद अमृत २५५

    आपल्या जाती आणि इतर सामाजिक रचना या धर्माशी संबंधित आहेत असे वरवर वाटले तरी वस्तुतः तसे नाही . राष्ट्र म्हणून आपले रक्षण व्हावे यासाठी त्या रचनांची गरज होती . जेव्हा या रचनांची आत्मसंरक्षणासाठी आवश्यकता राहणार नाही तेव्हा त्या आपोआप नाश पावतील .  

सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २५४

                        विवेकानंद अमृत २५४

     माझी समजूत जसजशी वाढली तसतसे या शतकानुशतके चालत आलेल्या सामाजिक रचनांचे महत्व मला कळले . एक काळ असा होता की, त्या निरर्थक आहेत असे मला वाटत होते . पण आता त्यांच्यावर टीका करण्याचे धैर्य मला होत नाही . कारण प्रत्येक रचनेत शतकानुशतकाचे, अनुभवाने आलेले शहाणपण साठलेले आहे . 

रविवार, १३ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २५३

                       विवेकानंद अमृत २५३

     इतर देश आपल्याला जो उपदेश करतात तो ऐकायचा ठरविला तर आपली हीच गती होईल . त्या शहाण्यांना सांगा की, तुम्ही स्वतः एक समाजरचना निर्माण करून दाखवा मग आम्ही तुमचे ऐकू . तुम्हाला एक कल्पना दोन दिवस धरून ठेवता येत नाही . तुम्ही भांडता, अपयशी होता . वसंत ऋतूतल्या पतंगासारखे क्षणभंगुर तुमचे आयुष्य . बुडबुडे वर यावेत नि फुटावेत तसे तुमचे जिणे . आमच्याप्रमाणे एक स्थिर रचना करून दाखवा . शतकानुशतके टिकतील असे नीतीनियम करा . तर मग तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ आहे . तोवर माझ्या मित्रांनो, माझ्या दृष्टीने तुम्ही निव्वळ भांबावलेली मुले आहांत . 


शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २५२

                       विवेकानंद अमृत २५२

     कोणत्याही तात्कालिक सामाजिक सुधारणांचा पुरस्कार करण्याचा माझा मानस नाही . दोष दूर करण्यासाठीही मी उभा नाही . मी तुम्हाला इतकेच सांगू इच्छितो की, आपल्या पूर्वजांनी मानवी विकासासाठी एक परिपूर्ण योजना आपल्यापुढे ठेवली आहे, ती प्रत्यक्ष व्यवहारात उतरविण्यासाठी पुढे व्हा ! मानवामानवांतील अतूट नात्याची, माणसामध्ये असलेल्या सुप्त देवत्वाची अनुभूती घ्या !  

विवेकानंद अमृत २५१

                      विवेकानंद अमृत २५१

     आपल्या पूर्वजांच्या दृष्टीने ' ब्राह्मण ' हा आदर्श होता . आपल्या सर्व धर्मग्रंथात हा आदर्श स्पष्टपणे मांडला आहे . युरोपात कार्डिनल हा सार्वभौम असतो . तो आपल्या वंशाची श्रेष्ठता सिद्ध करण्यासाठी प्राणपणाने प्रयत्न करतो . हजारो पौंड खर्च करतो . डोंगरावर बसून तो प्रवाशांची टेहळणी करत असे आणि साधेल तेव्हा त्यांना लुटत असे . अशा कोणा भयंकर हुकुमशहाशी आपली वंशावळ नेउन मिळविल्याखेरीज त्यांचे समाधान होत नाही .  

बुधवार, ९ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २५०

                         विवेकानंद अमृत २५०

     हिंदुस्थानात राजे, महाराजे, आपली कुलपरंपरा ही रानात राहणाऱ्या, कंदमुळे खाणाऱ्या, कौपिनधारी, वेदाध्ययनशील अशा कोणा ऋषीशी जोडतात . तुमचा कुलपुरुष कोणी ऋषी असेल तर तुमचे कुल उत्तम; अन्यथा नाही . 

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २४९

                      विवेकानंद अमृत २४९

     आपली कुलीनत्वाची कल्पना इतरांपेक्षा वेगळी आहे . अध्यात्मप्रवण आणि सन्यस्त वृत्तीचा ब्राह्मण आपला आदर्श आहे . ' ब्राह्मण ' या शब्दातून मला काय सुचवायचे आहे ? ज्याला ऐहीकाचा स्पर्श नाही आणि ज्याच्या ठिकाणी शुद्ध ज्ञान प्रकाशत आहे तो ब्राह्मण . असे ब्राह्मणत्व हे हिंदू जातीचे गंतव्य आहे . 

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २४८

                       विवेकानंद अमृत २४८

     ब्राह्मण हा विधीनियमांच्या वर आहे, राजांना तो अदंड्य आहे, त्याच्या शरीराला इजा होता कामा नये, हे सारे आपण ऐकले असेल ते सत्य आहे . असे समजू नका की, स्वार्थबुद्धीने हे कोणीतरी मूर्ख लोकांना सांगितलेले आहे . ब्राह्मणत्वाची खरी कल्पना समजून घ्या म्हणजे या म्हणण्याची सत्यता तुमच्या ध्यानी येईल .  

रविवार, ६ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २४७

                         विवेकानंद अमृत २४७

     ब्राह्मण या शब्दाचा खरा अर्थ ' ज्याने स्वार्थ विसर्जित  केला आहे तो . ' ज्ञान संपादन आणि ज्ञानप्रसार यांसाठीच ज्याने जीवन वाहिले आहे असा समाज जर असेल आणि एखाद्या देशात केवळ अध्यात्मसंपन्न आणि नितीसंपन्न अशा ब्राह्मणाचीच वसती असेल तर ' न दंड्यो न च दंडीकः ' अशी स्थिती येईल ! त्या देशात कायद्याची आवश्यकता राहणार नाही यात नवल ते कोणते ? 

विवेकानंद अमृत २४६

                     विवेकानंद अमृत २४६

     महाभारतात असे लिहिले आहे की, सत्ययुगात जगात केवळ ब्राह्मणांचाच निवास होता . त्यांची जसजशी अवनती सुरु झाली तसतशा वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या . जेव्हा ह्या कालचक्राचा आणखी एक फेरा पूर्ण होईल, तेव्हा पुन्हा आपण ब्राह्मणत्वाच्या मूळ आदर्शाकडे जाऊ . आता कालचक्र त्या दिशेने फिरूही लागले आहे .

शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २४५

                  विवेकानंद अमृत २४५

     जातीव्यवस्थेचा प्रश्न हा जे आधीच  उत्क्रांतीच्या वरच्या टप्प्यावर आहेत त्यांना खाली ओढून सुटणार नाही . खाण्यापिण्याच्या चैनीत बुडून राहिल्याने, भोगवादात बुडून गेल्याने सुटणार नाही . वेदान्तिक आदर्शाप्रमाणे आपण प्रत्येकाने आध्यात्मिक झाले पाहिजे . ब्राह्मणत्व, ब्रह्मपद प्राप्त करून घेतले पाहिजे . तरच प्रश्न सुटेल .

विवेकानंद अमृत २४४

                     विवेकानंद अमृत २४४ 

     तुम्ही तथाकथित आर्य असा, अनार्य असा, ऋषीकुलोत्पन्न असा, किंवा हीन जातीत जन्माला आलेले असा . या भारतभूमीत जन्माला आलेल्यांचे विधिलिखित एकच आहे . उच्च जातीत जन्माला आलेल्यांपासून तो भंगी म्हणून जो जन्माला आला त्याच्यापर्यंत सर्वांना अखेर आदर्श ब्राह्मणत्व प्राप्त करून घ्यायचे आहे . वस्तुतः सर्व जगासाठीच हा वेदांताचा सिद्धांत सत्य आहे . 


गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २४३

                    विवेकानंद अमृत २४३

     संपूर्ण मानवतेलाच सावकाश पण निश्चितपणे एका आध्यात्मिक आदर्शाकडे जायचे आहे . तो आदर्श शांत, स्थिर, भक्तिमान, शुद्ध, अहिंसक, ध्यानशील अशा मानवाचा आहे, म्हणजे देवत्वाचाच आहे . 

मंगळवार, १ ऑक्टोबर, २०१३

विवेकानंद अमृत २४२

                          विवेकानंद अमृत २४२

     हिंदुराष्ट्राचे पुनरुत्थान करण्यासाठी या राष्ट्राचा धर्म आमुलाग्र बदलला पाहिजे, नव्हे मोडून टाकला पाहिजे अशा विचारांचे काही सुधारक आज आपल्यात आहेत . त्यांच्यापैकी काही खरोखर विचारवंत आहेत . पण बहुतेक लोक आंधळेपणाने पाश्च्यात्यांचे अनुकरण करणारे आहेत, मूर्खपणाने वागणारेही आहेत. त्यांना आपण काय करतो आहोत तेही कळत नाही . अशांना परकीय कल्पना आपल्या धर्मात आणण्याविषयी फार उत्साह असतो . मूर्तीपूजेविरुद्ध एकाच धोशा त्यांनी लावलेला असतो . हिंदू धर्मात मूर्तीपूजा असल्याने हिंदुत्व सत्य नाही असा प्रचार ते करीत असतात . पण या तथाकथित ' मूर्तीपुजे ' मागे तत्व तरी काय याचा विचार ते करीत नाहीत . उगाच दुसरे लोक म्हणतात म्हणून ते हिंदुत्वावर खोटेपणाचा आरोप करतात .