बुधवार, २२ जानेवारी, २०१४

विवेकानंद अमृत

              ' विवेकानंद अमृत ' च्या निमित्ताने 

नमस्कार,
                 भारतीय युगपुरुष स्वामी विवेकानंदांची सार्ध शती, दिडशेवे जयंती वर्ष काल संपन्न झाले . संकल्पदिनी स्वामीजींच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे विचार फेसबुकवर लिहावेत असा संकल्प केला होता . काल तो पूर्ण झाला . 
      या लेखनाला अनेक जणांनी दाद दिली . श्री . जनार्दनबाब  कामत यांचा आवर्जुन उल्लेख करावासा वाटतो . त्यांनी प्रत्येक पोस्टला लाईक किंवा कमेंट केली आहे . चांगल्या गोष्टींना अनुल्लेखाने मारण्याच्या आजच्या युगात हि दाद निश्चित गौरवास्पद होती . त्यांच्या ऋणात राहणे मी पसंद करीन . 
     स्वामी विवेकानंदांना समजायचे असेल तर दुसरा विवेकानंद जन्मावा लागेल असे म्हणतात . हे शंभर टक्के सत्य आहे . पुढच्या दीड हजार वर्षांचा रोडमेप या महामानवाने जगाला दिला . त्याने अनुगमन आज जग करीत आहे . या युगकर्त्याला हि माला सादर अर्पण .  

विवेकानंद अमृत ३५५

                        विवेकानंद अमृत ३५५

     एका देवतुल्य वंशाची विराट कर्मशीलता, त्याची बहुविध कार्ये, त्यातले उसळते चैतन्य, विविध शक्तींच्या क्रिया आणि प्रतिक्रिया, आणि या सर्वांहून महत्वाचे म्हणजे त्याची प्रगाढ चिंतनशीलता यांनी हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास भरलेला आहे . 

           

मंगळवार, २१ जानेवारी, २०१४

विवेकानंद अमृत ३५४

                        विवेकानंद अमृत ३५४

     निसर्गाशी झालेल्या अनेक युद्धामध्ये त्यांनी मिळविलेल्या विजयाच्या शतावधी ध्वजा अलीकडे प्रतिकूल परिस्थितीच्या झंझावातात फाटून-तुटून गेल्या असल्या आणि काळाच्या ओघात जीर्ण-शीर्ण झालेल्या असल्या तरी प्राचीन हिंदुस्थानची विजयगाथा त्या आजही सांगत आहेत.  

विवेकानंद अमृत ३५३

                        विवेकानंद अमृत ३५३

     एक वस्तुस्थिती मात्र आपण ध्यानात ठेवली पाहिजे . जिथे संस्कृतीच्या उषःकालाची प्रभा प्रथम फाकली, जिथे गाढ तत्वशीलतेने आपले रूप प्रथम प्रकट केले, त्या प्राचीन भारतीय वंशाच्या विचारधनाचा आणि भावनाकोषाचा वारसा सांगणारे आपण शेकडो-सहस्रो संतान आजही हिंदुस्थानात आहेत .  

सोमवार, २० जानेवारी, २०१४

विवेकानंद अमृत ३५२

                         विवेकानंद अमृत ३५२

     नासतः सत जायते - जे नाही त्यातून जे आहे त्याचा जन्म संभवत नाही .  
     अनस्तित्व हे अस्तित्वाचे कारण होऊ शकत नाही . शून्यातून काहीतरी अस्तित्वात येऊ शकत नाही . कार्यकारणसिद्धांत हा स्वयंप्रभव आहे . स्थल आणि काल यांच्या तो पलीकडे आहे अशी मांडणी आर्य जातीच्या प्राचीन कवी-ऋषीनी केली आहे . तत्वज्ञांनी मांडली आहे . हा सिद्धांत ही आजच्याही हिंदूंच्या संपूर्ण जीवनाची कोनशीला आहे . 

विवेकानंद अमृत ३५१

                       विवेकानंद अमृत ३५१

     यज्ञवेदींच्या विटांची रचना करता करता या अदम्य प्रतिभेला भूमितीची प्रमेये स्फुरली . पूजा आणि आहुतींचे मुहूर्त निश्चित करण्यासाठी नक्षत्रांचा अभ्यास करता करता जगाला चकित करतील असे नक्षत्रज्ञानाचे शोध त्यांनी लावले . त्यांच्या सर्वगामी प्रज्ञेने अन्य कोणत्याही प्राचीन वा आधुनिक वंशाने दिली नव्हती एवढी मोठी गणितशास्त्राची देणगी जगाला दिली . 

विवेकानंद अमृत ३५०

                        विवेकानंद अमृत ३५०

     आधुनिक युरोपच्या नवरचनेला प्राचीन हिंदूंचे रसायनशास्त्र, त्यांच्या वैद्यकातील धातुसंयुगांचा उपयोग, त्यांनी बसविलेली स्वरसप्तके, त्यांनी लावलेला तंतुवाद्याचा शोध हे सर्व मोठेच उपकारक झाले आहे . 

गुरुवार, १६ जानेवारी, २०१४

विवेकानंद अमृत ३४९

                     विवेकानंद अमृत ३४९

    हिंदूंच्या कल्पकतेतून बालमनाला घडवतील अशा अद्भुत कथा जन्माला आल्या . जगातील प्रत्येक सुसंस्कृत देशात या कथा शिशुमंदिरातून सांगितल्या जातात . त्यातून मुलांची मने संस्कार-संपन्न होतात . 

 

बुधवार, १५ जानेवारी, २०१४

विवेकानंद अमृत ३४८

                        विवेकानंद अमृत ३४८

     हिंदूंच्या बुद्धीच्या प्रखर शस्त्राला मखमलीच्या आवरणाप्रमाणे वेढून असलेली त्यांची एक मनःशक्ती म्हणजे कविप्रतिभा . हिंदूंचा धर्म, तत्वज्ञान, इतिहास, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र हे सर्व कविप्रतिभेच्या पुष्पासनावर शोभत आहे . ज्या भाषेत हे सर्व निर्माण झाले त्या भाषेचे नाव ' संस्कृत ' म्हणजे ' परिपूर्ण ' असे आहे .   

मंगळवार, १४ जानेवारी, २०१४

विवेकानंद अमृत ३४७

                      विवेकानंद अमृत ३४७

     विविध विषयांची प्रतिमासृष्टी संस्कृतमध्ये जेवढी उत्तम रीतीने व्यक्त झाली आहे तेवढी अन्य भाषांमध्ये होऊ शकली नसती . अगदी गणितासारख्या रुक्ष विषयालाही सुस्वर संख्यापाठाने रुची प्राप्त करून दिली आहे .  

विवेकानंद अमृत ३४६

                       विवेकानंद अमृत ३४६

     विचक्षण मनःशक्ती आणि दृष्ट्या प्रतिभेची भरारी हि हिंदू मनाच्या जडणघडणीची दोन प्रमुख वैशिष्ट्ये आहेत . हि दोन मिळून हिंदू राष्ट्रीय चारित्र्याचा प्राणस्वर निर्माण झाला आहे . बुद्धी आणि प्रतिभेचे हे असे रसायनच एखाद्या वंशाला इंद्रियज्ञानाच्या पलीकडे झेपावण्याची शक्ती देते . लोह छेदील अशी धारदार आणि तरीही लवविली तर मंडलाकार होईल इतकी लवचिक अशी ही प्रज्ञाच विश्वरहस्याचा वेध घेते .   

सोमवार, १३ जानेवारी, २०१४

विवेकानंद अमृत ३४५

                       विवेकानंद अमृत ३४५

     त्यांनी सोन्यारुप्याच्या अक्षरात काव्य लिहिले, रत्नांच्या स्वरगीतिका रचल्या, संगमरवरातून सौंदर्याचे चमत्कार घडविले, रंगांची माया उभी केली आणि स्वप्नसृष्टीतच आढळेल असे तलम पोत आपल्या पार्थिव हातांनी विणले . या सर्वांच्यामागे सहस्रावधी वर्षांचा हा बुद्धीप्रतिभेचा दुपदरी हिंदू प्राणस्वर होता .   

रविवार, १२ जानेवारी, २०१४

विवेकानंद अमृत ३४४

                        विवेकानंद अमृत ३४४

     बुद्धी आणि प्रतिभा या दोन साधनानीच या वंशाचा विकास झाला आहे . वेदांमध्ये जी संस्कृती आढळते ती विकासाच्या एका मोठ्या टप्प्यावरची संस्कृती आहे . त्या आधी या धर्माची आणि संस्कृतीची क्रमशः विकसणारी अनेक रूपे कालौघात विलीन झालेली असली पाहिजेत .  

शनिवार, ११ जानेवारी, २०१४

विवेकानंद अमृत ३४३

                      विवेकानंद अमृत ३४३

     सुघटित उपासनास्थळ, काळजीपूर्वक रचलेले संस्कार, विविध व्यवसायांमुळे झालेली समाजाची जातीनुरूप विभागणी, आवश्यक त्या सर्व सोयी आणि विपुल सुखसाधने असे आपल्याला हिंदूंच्या या प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडते . 

गुरुवार, ९ जानेवारी, २०१४

विवेकानंद अमृत ३४२

                          विवेकानंद अमृत ३४२

     अन्य कोणत्याही देशाआधी या प्राचीन भूमीत ज्ञानाचा निवास झाला . सागराप्रमाणे विशाल पात्रांच्या सरिता, हिममंडीत शिखरराशींनी शोभणारा,जणू अवकाशातील गहनतम रहस्यांचा वेध घेणारा प्राचीनतम हिमाचल ही त्या आत्मप्रेरणेचीच पार्थिव रूपे होत . अवनितलावरील श्रेष्ठतम ऋषीवरांच्या पदधुलीने पावन झालेली हीच ती हिंदू भूमी . 

विवेकानंद अमृत ३४१

                       विवेकानंद अमृत ३४१

     मनुष्यमात्राचे सत्यस्वरूप कोणते याविषयीचे गहन चिंतन प्रथम येथेच उदेजले . अंतःसृष्टीचा शोध सुरु झाला . आत्म्याचे अमृतत्व, सर्वसाक्षी परमेश्वराचे अस्तित्व, मनुष्यमात्रात आणि निसर्गात भरून राहिलेली ईश्वरी सत्ता याविषयीचे तत्वज्ञान येथेच निर्माण झाले . धर्म, तत्वज्ञान यातील चिंतनाने येथेच परिपक्वतेचे शिखर प्राप्त केले . अध्यात्म आणि तत्वज्ञान यांच्या चैतन्यलहरी येथून पुनःपुन्हा उसळत निघाल्या आणि त्यात संपूर्ण जग पुनःपुन्हा सुस्नात झाले .  


बुधवार, ८ जानेवारी, २०१४

विवेकानंद अमृत ३४०

                         विवेकानंद अमृत ३४०

      कशी ही विलक्षण भूमी ! येथे कुणीही येउन उभा राहो-मग तो परका असेल किंवा या भूमीचा पुत्र असेल-त्याचे हृदय जर पशूचे नसेल तर त्याला जाणवेल की, पृथ्वीच्या शुद्धतम, श्रेष्ठतम, इतिहासालाही शतकानुशतके ज्या काळाच्या खुणा टिपता आल्या नाहीत अशा काळापासून माणसाला पशुत्वाकडून देवत्वाकडे नेण्याची साधना करीत आहेत अशा संतानांच्या चैतन्यदायी विचारात आपण न्हाऊन निघत आहोत . साऱ्या वातावरणातच आत्मशक्तीचे स्पंद स्फुरताहेत .  

विवेकानंद अमृत ३३९

                        विवेकानंद अमृत ३३९

     तत्वज्ञान, नीती आणि अध्यात्म या शास्त्रांची ही पुण्यभूमी आहे . पशुत्वाकडून देवत्वाकडे चाललेल्या संघर्षमय प्रवासात, पार्थिवाचे ओझे झुगारून देत जन्म आणि मृत्युच्या पलीकडच्या, चिदानंदस्वरूप अशा आत्मधामाच्या मार्गावरची ही विसावण्याची स्थळे आहेत . 


मंगळवार, ७ जानेवारी, २०१४

विवेकानंद अमृत ३३८

                        विवेकानंद अमृत ३३८ 

     या हिंदुभूमीत सुखाचा कलश काठोकाठ भरलेला होता ; व्यथेचा तर त्याहूनही पूर्ण होता . पण तारुण्याचा बहर फुललेला असताना, समृद्धीच्या शेजेवर पहुडलेले असताना, वैभवाच्या आणि सामर्थ्याच्या शिखरावर असतानाच येथील मानवांना शोध लागला की, हे सर्व व्यर्थ आहे . ती सुंदर, रंगीत स्वप्ने त्या सत्यदर्शनात वितळून गेली !  

विवेकानंद अमृत ३३७

                        विवेकानंद अमृत ३३७

     मानवांच्या या विराट समूहात सुख आणि दुःख, सामर्थ्य आणि दौर्बल्य, समृद्धी आणि दारिद्र्य, हर्ष आणि शोक, स्मित आणि अश्रू  , जीवन आणि मृत्यू  यांच्या प्रबल प्रवाहांच्या मंथनातून शाश्वत शांतीच्या विरघळवून टाकणाऱ्या गंभीर लयनादातून संन्यासधर्माची दृढ आसनभूमी सिद्ध झाली .  

सोमवार, ६ जानेवारी, २०१४

विवेकानंद अमृत ३३६

                       विवेकानंद अमृत ३३६

     जीवनाची अपरंपार ओढ, मृत्यू टाळण्यासाठी केले जाणारे वेडे प्रयास, त्यांच्या असफलतेतून येणाऱ्या निराशेचे निःश्वास हे सारे भारतीय प्रज्ञेने पहिले . जीवन-मृत्युच्या या रहस्याचा त्यांनी शोध घेतला . त्यांना आजवर कोणालाही गवसले नव्हते असे उत्तर गवसले . ते उत्तर असे की, जीवन हीच मुळी माया आहे . जीवन म्हणजे अंतिम सत्याची केवळ छाया आहे .  

विवेकानंद अमृत ३३५

                        विवेकानंद अमृत ३३५

     केवळ याच हिंदूभूमीत धर्म हा आचरणीय, वास्तव होता . आणि इतर देशात जीवनाची सुखे भोगण्याकरिता प्रसंगी आपल्याहून दुर्बलांची पिळवणूक करतही स्त्री-पुरुष ज्याप्रमाणे अंधपणे स्वतःला झोकून देतात, तशाच बेभानपणे या भूमीत स्त्री-पुरुष आत्मशोधार्थ स्वतःला झोकून देतात .   

रविवार, ५ जानेवारी, २०१४

विवेकानंद अमृत ३३४

                        विवेकानंद अमृत ३३४

     येथे आणि केवळ येथेच मानवी हृदय इतके विशाल, अनंत झाले की, त्यात केवळ मनुष्यजातच नव्हे तर पशु-पक्षी ; इतकेच नव्हे तर एका मरुकणासह श्रेष्ठतम आणि कनिष्ठतम साऱ्यांनाच स्थान मिळाले . येथेच मानवी आत्म्याला उमगले की, सारे विश्व एक-अखंड आहे . त्याचा स्वतःचा प्राणस्पंद हा विश्वाचा प्राणस्पंद झाला .   

विवेकानंद अमृत ३३३

                       विवेकानंद अमृत ३३३

     जगावर आपल्या मातृभूमीने मोठेच ऋण करून ठेवले आहे, कोणत्याही देशाशी तुलना केली तरी ' सौम्यप्रकृती ' च्या हिंदूने जगाचे जेवढे भले केले आहे तेवढे अन्य कोणीही केलेले नाही .  ' सौम्यप्रकृती हिंदू  ' हा शब्द काही वेळेला उपहासाने वापरला जातो . पण त्या उपहासामागेसुद्धा एक आश्चर्यकारक सत्य लपलेले आहे .  ' सौम्यप्रकृती हिंदू ' हे परमेश्वराचे प्रिय संतान आहे . 

विवेकानंद अमृत ३३२

                           विवेकानंद अमृत ३३२

     जेव्हा ग्रीस अस्तित्वात नव्हता, जेव्हा रोमची कल्पनाही कुणी केली नव्हती, आजच्या आधुनिक युरोपियांचे पूर्वज जेव्हा रानटी अवस्थेत जंगलात राहात होते आणि स्वतःची शरीरे रंगवीत होते तेव्हा या हिंदुभूमीत एक संस्कृती नांदत होती .   

शनिवार, ४ जानेवारी, २०१४

विवेकानंद अमृत ३३१

                         विवेकानंद अमृत ३३१

     इतिहासाकडे ज्याची नोंद नाही, परंपरा ज्या गहन अंधारात डोकावूसुद्धा धजत नाहीत अशा काळापासून हि मातृभूमी एकामागून एक शुभ विचारांचे प्रेषण करीत आहे . उच्चारलेल्या प्रत्येक शब्दामागे आशीर्वाद, शांती यांचे स्निग्ध सामर्थ्य आहे . जगातले इतर वंश हे जेत्यांचे वंश होत, आपण जेत्यांचा वंश नव्हतो . आपल्या भाग्यात हे खरोखरच मोठे वरदान आहे .  

विवेकानंद अमृत ३३०

                         विवेकानंद अमृत ३३०

     एके काळी ग्रीक योद्ध्यांच्या सामर्थ्यवान पदाघाताखाली सारे जग थरथरत होते . पण तो ग्रीकांचा प्राचीन देश या भूमितलावरून पार पुसला गेला आहे . आता त्याविषयी सांगण्यासारख्या कथासुद्धा उरलेल्या नाहीत . एके काळी तीक्ष्ण दृष्टीचे रोमन गरुड जगात जे जे वांछनीय आहे त्यावर नजर ठेवीत होते . त्यावर घिरट्या घालीत होते . मनुष्यजातीच्या उरावर रोमनसत्ता स्वार झाली होती. रोमच्या नावानेही अवघे भूमंडळ थरकापत असे . पण जेथून सीझर राज्य चालवीत असे त्या केपिटल ह्या टेकडीवर आता केवळ केविलवाणे अवशेष आणि कोळीष्टके शिल्लक आहेत .  

शुक्रवार, ३ जानेवारी, २०१४

विवेकानंद अमृत ३२९

                      विवेकानंद अमृत ३२९

     काही वैभवशाली राष्ट्रे उदयाला आली आणि अस्ताला गेली . काही काळ त्यांनी अमर्याद सत्ता उपभोगली आणि नंतर पाण्यावरच्या बुडबुड्यासारखी ती विरून गेली . मनुष्यजातीच्या इतिहासावर त्यांनी ठसा उमटविला तो इतकाच . 

गुरुवार, २ जानेवारी, २०१४

विवेकानंद अमृत ३२८

                        विवेकानंद अमृत ३२८

    आपण अजून चैतन्यशाली आहोत . मनू  जर आजच्या काळात परतून आला तर तो बिलकुल गोंधळून जाणार नाही . आपण कुठल्यातरी परक्या प्रदेशात आलो आहो असे त्याला वाटणार नाही . सहस्रो सहस्रो वर्षे विचार करून जे नीतीनियम येथे बसविलेले आहेत ते शतकानुशतकांच्या संचित अनुभवातून दृढमूल झालेले सामाजिक नियम कशानेही बदलत नाहीत . आघातामागून आघात होतात . त्यांचा परिणाम एवढाच होतो की हे नियम आणि चालीरीती अधिकच बलवत्तर होतात . अधिकच स्थिर होतात . 




विवेकानंद अमृत ३२७

                    विवेकानंद अमृत ३२७

     हेच या सर्व गोष्टींचे केंद्र, ज्यातून रक्तप्रवाह शरीरभर धावतो ते हृदय ! राष्ट्रीय जीवनाचा मूलस्त्रोत जर कुठे असेल तर तो इथे आहे . जगाचा पुष्कळ अनुभव घेतल्यावर मी हे सांगत आहे .  

बुधवार, १ जानेवारी, २०१४

विवेकानंद अमृत ३२६

                        विवेकानंद अमृत ३२६

     शतकानुशतके परकीय आक्रमणाचे आघात सहन केलेली हीच ती भारतभूमी . दुर्दम्य चैतन्य आणि अविनाशी जीवन यांसह एखाद्या शिळेहूनही दृढतेने जगात उभी असलेली हीच ती भूमी . हिचे जीवन हिच्या आत्म्यासारखेच अनादि-अनंत, अमृत आहे आणि अशा या भूमीचे आपण सारे संतान आहोत .