बुधवार, २८ ऑगस्ट, २०१९

३४ रा . स्व . संघ

 ३४  रा . स्व . संघ 


            मनुने एका मासळीचा जीव वाचविला व त्याला वाढविले . पुढे हा मासा एवढा वाढला, मोठा झाला कि प्रलयकाळी त्याने मनुच्या नौकेचे रक्षण केले .त्यामुळे सर्व जीवसृष्टी नष्ट होण्याचा धोका टळला .राष्ट्रीय स्वयंसेवक संघही त्या माशाप्रमाणे भारतीय संस्कृतीच्या बीजाचे रक्षण करून संपूर्ण विश्वात या संस्कृतीचा भव्य, तेजस्वी अविष्कार घडवून आणेल, याच दृष्टीने आपण संघाकडे पाहिले पाहिजे .                                                                                      - प. पू . श्रीगुरुजी
          संघाच्या महान जीवनकार्यावर आपली अढळ निष्ठा असू द्या. संघाचे ध्येय हृदयावर कोरून ठेवा. अखिल हिंदू समाजात आपल्याला नवचैतन्य आणि निर्भयता उत्पन्न करावयाची आहे. सामाजिक बल  उत्पन्न करून समाजघटकांत स्वाभिमान आणि आत्मविश्वास जागवावयाचा आहे.                                                                                                - पू . डॉक्टर 
      राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदू समाजाचे राष्ट्रीय स्वरूप ओळखून प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात ज्वलंत भारत भक्ती जागविण्याचेराष्ट्रसेवेसाठी सर्वस्वार्पण युक्तशील चारित्र्य संपन्न जीवन स्वीकारण्याचे तसेच त्यादृष्टीने एकरस एकात्म समाज जीवन असेतु हिमालय पुन्हा प्रतिष्ठापित करण्याचा निश्चय पूर्वक प्रयत्न करीत असतो.                                - प. पू . श्रीगुरुजी

        आजकाल आपली फार स्तुती होत आहे. पण त्यामुळे हुरळून जाऊन आपण फार मोठे काम केले असे समजू नका. व्यक्तीशः असा अभिमान तर वाईटच आहे, पण संघशः तसा अभिमान धरणेही योग्य नाही. कारण लोक स्तुती करतात म्हणजे त्यांना हे काम आवडते इतकाच त्याचा अर्थ समजावा व स्तुतीने हुरळून न जाता आपले कार्य अधिक जोमाने करू लागावे. प्रशंसेमुळे मनाला आनंद होतो हे खरे आहे, पण त्याबरोबरच आपली जबाबदारीही वाढते हे विसरून चालणार नाही. 

५ 
     हिंदुराष्ट्राच्या परमवैभवाचे साधन असलेल्या धर्माचे संरक्षण आणि त्यासाठी हिंदूंची विजयशालिनी संघटित कार्यशक्ती म्हणजेच या संपूर्ण हिंदू समाजाची सुसंघटीत तसेच अनुशासीत व्यवस्थेला आधार देणे हेच संघकार्य आहे.

६ 
          कोणताही समाज सामर्थ्य संपन्न व्हावा व ते सामर्थ्य कायम रहावे यासाठी समाजात समाजहितदक्ष, प्रामाणिक, समाजासाठी कोणतेही कार्य करण्याची तयारी असलेले सदैव तत्पर, कर्तव्यदक्ष आणि त्यागी कार्यकर्त्यांची उज्ज्वल परंपरा निर्माण होण्याची आवश्यकता आहे . आणि ही परिस्थिती चिरकाल राहावी याकरिता अशी मूलगामी परिस्थिती निर्माण करणारा निरपेक्ष पवित्र स्त्रोत निर्माण करण्याचे कार्य संघाने स्वीकारले आहे .
                                 - भय्याजी  दाणी
       राष्ट्राचा कलंक दूर करून त्याला महान करण्यासाठी मूठभर लोकांचे प्रयत्न पुरेसे नाहीत. मूठभर लोकांनी तर राजस्थान, पंजाब, महाराष्ट्र या प्रांतात बलिदान केले आणि जनसामान्यांनी सर्वसाधारण त्यांना भगवान मानून त्यांच्या तसबिरी लावून पूजा, आरती करू लागले. असं निष्क्रिय कर्म करून देशाचे दुःख, दैन्य दूर होत नसते म्हणून डॉक्टर हेडगेवारांनी देश कल्याणसाठी आवश्यक गुणानी युक्त अशा कार्यकर्त्यांची मोठी संख्या उभी करून संपूर्ण समाजाला गुणसंपन्न करण्याचा निश्चय केला. त्यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निर्माण (स्थापन) झाला.

      संघकार्य परिस्थिती निरपेक्ष आहे असे आपले प. पू. डॉक्टरसाहेब म्हणत असत. असे म्हणण्याचे कारण असे की कोणत्याही समाजाला समर्थ करण्यासाठी व ते सामर्थ्य टिकविण्यासाठी समाजामध्ये समाजहितेच्छु, प्रामाणिक कष्ट करण्यास सदैव तत्पर, उद्योगशील, कर्तव्यदक्ष तसेच त्यागी कार्यकर्त्यांच्या उज्वल परंपरेची आवश्यकता असते व हे कार्य सातत्याने चालू राहावे लागते, याच मूलगामी, परिस्थिती निरपेक्ष पावन प्रवाहाचे कार्य संघाने अंगिकारले आहे. -            भैय्याजी दाणी

       हिंदू संस्कृतीचा विध्वंस करून हिंदू लोकांना कायमचे पारतंत्र्यात डांबून टाकण्याच्या उद्देशाने जे जे परधर्मीय लोक हिंदुस्थानात आले असतील व आज राहत असतील त्यांच्या त्यांच्या उद्दाम आक्रमणापासून हिंदू समाजाचे रक्षण करणे व हे करत असताना पडतील ते कष्ट सहन करण्याची, येतील ती संकटे भोगण्याची, इतकेच नव्हे तर ! सदैव देहत्यागासही तयार राहण्याची मनोवृत्ती सर्व हिंदू समाजात उत्पन्न करून त्यांची संघटना करणे हे कार्य संघाला करावयाचे आहे.

१०
       जर आपल्या हिंदुस्तानाच्या कल्याणार्थ कोणत्याही कल्पना या संघटनेच्या मनात आल्या तर त्या कृतीत उतरविताना आपली संघटना कोती आहे, दुर्बल आहे, म्हणून ती काही करू शकत नाही, असे म्हणण्याची पाळी येऊ देणार नाही. एवढीच पवित्र, स्वाभिमानी, उज्वल व तेजस्वी भावना ह्रदयाशी बाळगून ही संघटना जास्तीत जास्त प्रबल व प्रभावी कशी होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. आपल्या ऐहिक जगात आपल्या हिंदू राष्ट्राकरिता स्वाभिमानाने व उजळ माथ्याने जगण्याकरिता जे जे काही करावे लागेल तेथे करण्याचे या संघटनेने ठरविलेले आहे. हे कार्य किती मोठे आहे व याकरिता किती झटले पाहिजे हे मी सांगावयास नको. सुज्ञ, विचारी व बुद्धिप्रधान हिंदू तरुण या कार्यार्थ स्वतःला वाहून घेतील असा माझा आत्मविश्वास आहे.                          पू. डॉ. हेडगेवार

११
       आता सर्व ऐषआराम तुच्छ आहेत असा विचार करून, जीवनातील किमान आवश्यकतांचाच केवळ विचार करून, उरलेली सर्व शक्ती संघकार्यार्थ लावावी असा निश्चय करावा. वैयक्तिक जीवनात थोडी गैरव्यवस्था सोसावी लागली तरी संघकार्याची सुव्यवस्था दृढ करण्याचाच आपला संकल्प असला पाहिजे.

१२

  “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वैशिष्टय़ म्हणजे, केवळ ध्येय निश्चित करून समाधानी न होता, त्या ध्येयानुसार आपली कार्यपद्धती विकसित केली.या कार्यपद्धतीबाबत आपण असे म्हणू शकतो की, संपूर्ण हिंदू समाज संघटीत करण्याच्या दृष्टिकोनातून एकच, योग्य आणि परिणामकारक कार्य असेल तर ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कार्यपद्धती आहे, त्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही.”                        मा दत्तोपंत ठेंगडी



                     



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा