रविवार, २ फेब्रुवारी, २०२५

१४० सामान्य माणूस

                                       १४०  सामान्य माणूस 

         राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कल्पिलेल्या वैभवाच्या रूपरेषेत सामान्य माणसालाच प्रमुख स्थान दिले गेले आहे. सामान्य माणसाच्या राष्ट्रीय व व्यक्तिगत चारित्र्याची पातळी उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात जितक्या प्रमाणात उत्कृष्ट गुण असतील तितक्या प्रमाणात देश मोठा व प्रगतिशील मानला जाईल.

        आपल्या कार्याची वृद्धी हे सर्व प्रश्नांना उत्तर होय. आपण निष्ठेने काम करीत राहिले पाहिजे. आपल्या अंतःकरणातील स्नेहभावनेचा स्पर्श, आपल्या बोलण्यातील गोडवा, यांचा लाभ झोपडी झोपडी पर्यंत पोहोचला पाहिजे. सर्वांना संघस्थानावर आणून आपल्या निरनिराळ्या कार्यक्रमातून आपण सर्व एका समाजाचे घटक आहोत ही भावना वागवून परस्पर सहकार्याने काम करण्याची प्रवृत्ती निर्माण करावी लागेल. संघ स्थानावरील हे चैतन्यमय  वातावरण आता घराघरात पोहोचले पाहिजे. प्रत्येक शाखेने त्या दृष्टीने आपली योजना करावी. वनवासी क्षेत्रात आपले कार्यकर्ते गेले आहेत. तसेच प्रत्येक शहरात दुर्लक्षित, मागासलेल्या वस्त्या आहेत. त्या वस्त्यापर्यंत आपण पोहोचले पाहिजे. आपल्या परिश्रमाने, अंत:करणातील सहानुभूतीने, अत्यंतिक स्नेहभावनाने आपण सर्वांची मने जिंकली पाहिजेत. कोणाचे मनात अविश्वास, गैरसमज, भीती असेल तर तीही आपल्या निस्वार्थ वागणुकीने दूर केली पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा